“आपत्कालीन परिस्थितीत शक्ती(पीठ)मॅनने उपयोजना करायला हव्यात”; वाहतूक कोंडीवर विरोधकांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 12:17 IST2026-02-05T12:16:00+5:302026-02-05T12:17:35+5:30
Mumbai Pune Expressway Traffic Jam News: हाच का तुमचा विकास, फक्त आता या अडचणीला नेहरू जबाबदार आहेत, एवढे म्हणू नका, अशी टीका विरोधकांनी केली आहे.

“आपत्कालीन परिस्थितीत शक्ती(पीठ)मॅनने उपयोजना करायला हव्यात”; वाहतूक कोंडीवर विरोधकांची टीका
Mumbai Pune Expressway Traffic Jam News: पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर आडोशी बोगद्याजवळ मंगळवारी (३ फेब्रुवारी) सायंकाळी ज्वलनशील रसायन वायू वाहून नेणारा टँकर उलटला. टँकरमधून सुरू असलेल्या वायूगळतीमुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव वाहतूक पूर्णतः बंद ठेवल्याने ३० तास महामार्ग ठप्प राहिला. परिणामी, द्रुतगती महामार्गासह जुना मुंबई-पुणे महामार्गही प्रभावित होऊन २५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. कोंडीमुळे निर्माण झालेली परिस्थिती व भविष्यात अशी घटना घडू नये, घडल्यास कोणत्या प्रकारची सज्जता असावी, याबाबत चौकशी करुन शिफारशींसह अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमएसआरडीसीला दिले आहेत.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आडोशी बोगद्यानजीक टँकर अपघातानंतर मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली. गॅस गळतीमुळे महामार्ग दोन्ही बाजूंनी बंद ठेवल्याने अभूतपूर्व कोंडी झाली. या कोंडीमुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, कॅन्सरग्रस्तांसह इतर आजारी व्यक्तींना त्रास झाला. या अभूतपूर्व वाहतूक कोंडीवरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. उद्धवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी एक्सवर पोस्ट करत, फक्त आता या अडचणीला नेहरू जबाबदार आहेत, एवढं म्हणू नका बस, असा टोला लगावला आहे.
आपत्कालीन परिस्थितीत शक्ती(पीठ)मॅनने उपयोजना करायला हव्यात
एक टँकर काय उलटतो आणि राज्यातील दोन महत्त्वाच्या शहरांचा संपर्क २४ तासांसाठी तुटतो. व्वा! काय ही व्यवस्थेची अवस्था. उद्या आपत्कालीन परिस्थतीत असली शरम ओढवण्यापेक्षा यावर शक्ती(पीठ)मॅन ने उपयोजना करायला हव्यात! फक्त आता या अडचणीला नेहरू जबाबदार आहेत, एवढं म्हणू नका बस.., असे अंबादास दानवे यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, १ ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीच्या गप्पा मारणारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सातत्याने पायाभूत सुविधांचे ढोल बडवत आहेत. पण याच महाराष्ट्रात मुंबई–पुणे एक्स्प्रेस वे पूर्णपणे ठप्प आहे. राज्यातील सर्वात महत्त्वाचा दळणवळण मार्ग ठप्प झाल्याने हजारो वाहने आणि लाखो नागरिक अक्षरशः अडकून पडले आहेत. इतक्या मोठ्या संकटाच्या वेळी सरकारकडे कोणतीही पर्यायी व्यवस्था नाही, कोणताही आपत्कालीन आराखडा नाही, हेच या तथाकथित विकासाचे खरे चित्र आहे. पायाभूत सुविधांच्या नावाखाली सुरू असलेली लूट, निकृष्ट कामे आणि नियोजनाचा अभाव यामुळेच आज राज्य या अवस्थेत पोहोचले आहे. ट्रॅफिक जाम आणि प्रदूषणाने जनतेचा अक्षरशः जीव गुदमरतो आहे. आणि दुसरीकडे, सरकारमध्ये बसलेले लोक निर्लज्जपणे जनतेचे हाल पाहत आहेत. ना जबाबदारी, ना संवेदनशीलता, ना उत्तरदायित्व हाच का तुमचा “विकास”?, अशी विचारणा काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
एक टँकर काय उलटतो आणि राज्यातील दोन महत्त्वाच्या शहरांचा संपर्क २४ तासांसाठी तुटतो. व्वा! काय ही व्यवस्थेची अवस्था. उद्या आपत्कालीन परिस्थतीत असली शरम ओढवण्यापेक्षा यावर शक्ती(पीठ)मॅन ने उपयोजना करायला हव्यात! फक्त आता या अडचणीला नेहरू जबाबदार आहेत, एवढं म्हणू नका बस..… pic.twitter.com/NysP98EwB1
— Ambadas Danve (@iambadasdanve) February 5, 2026