राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये वाघ व बिबट्यांची दहशत; बिबट्यांच्या मुक्त संचारामागे कारणे काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 12:54 IST2025-11-19T12:32:04+5:302025-11-19T12:54:58+5:30
Amravati : वनविभागाकडे केवळ ९ हजार वनरक्षक; जलदकृती २४ वनाधिकारी आणि २२० वनरक्षकांची गरज

Terror of tigers and leopards in 25 districts of the state; What to do about the free movement of leopards?
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: जंगलच नव्हे, तर मानवी वस्तीत येणाऱ्या वाघ, बिबट्यांपासून मानवाचे संरक्षण करण्यासाठी वनविभागाकडे केवळ ९,७८५ वनरक्षक अत्यंत कमी असून, महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यांमध्ये वाघ व बिबट्यांची दहशत निर्माण झाली आहे. जलदकृती २४ वनाधिकारी आणि २२० वनरक्षकांची गरज आहे. १४ वनविभागामध्ये प्रादेशिकचे ४८ विभान ३७८ परिक्षेत्र आणि ५६१३ बीट असून, वन्यजीव विभागांचे १३ विभान व १०३ परिक्षेत्र ज्यामध्ये केवळ ९७० बीट मोडतात. याशिवाय सामाजिक वनीकरणाचे उपविभाग असून, यामध्ये २५० परिक्षेत्र आणि ९९० व उर्वरित वनरक्षक साईट पोस्टिंग म्हणून कामे करतात. पोलिस विभागामध्ये लोकसंख्येच्या आधारावर पोलिस स्टेशनची निर्मिती केली जाते. तर वनविभागामध्ये जंगलाच्या क्षेत्रफळानुसार परिक्षेत्र व बीटची निर्मिती केली जाते. सध्या महाराष्ट्रात वन्यजीव विभागाचे ६ क्षेत्र संचालक कार्यरत आहेत. याशिवाय नाशिक, पुणे, ठाणे, मुंबई (कांदळवन), छत्रपती संभाजीनगर येथे वनसंरक्षक अशी पदे निर्माण करण्यात आली आहेत. मात्र, वनपरिक्षेत्र अधिकारी आणि वनरक्षकांची पदे निर्माण करण्यात आलेली नाही. ९,७८५ वनरक्षकांमध्येच वन्यजीव विभागाचा कारभार हाकला जातो.
पदांची कमतरता
सध्या राज्यामध्ये वाघ आणि बिबट्यांच्या दहशतीमुळे सर्वसामान्य नागरिक भयभीत झालेले आहेत, अशावेळी वन्यजीव विभाग बळकट करणे गरजेचे असताना केवळ ९,७८५ वनरक्षकांच्या भरोशावर वन्यजीव विभागाचा गाडा हाकला जात आहे. आयएफएस लॉबी ही केवळ सोईसाठी पदांची निर्मिती करीत असल्याचे चित्र आहे. वनविभागामध्ये क्षेत्रीय पदांची निर्मिती करणे आवश्यक आहे. जलद कृती दलासाठी नव्याने वनपरिक्षेत्र अधिकारी या पदापासून तर वनरक्षकांची पदे निर्माण करणे आवश्यक आहेत.
राज्यात केवळ ९,७८५ वनरक्षक
विदर्भानंतर पश्चिम महाराष्ट्र, कोकण, ठाणे, मुंबई, नाशिक या भागामध्ये वनक्षेत्र अधिक प्रमाणात असताना आणि पुणे, कोल्हापूर, नाशिक, जुन्नर, आंबेगाव, अहिल्यानगर, पालघर, बोरीवली, गोरेगाव, निफाड या भागांमध्ये बिबट्यांची संख्या कमालीची वाढलेली दिसून येत आहे. गेल्या २० वर्षांमध्ये वनविभागामध्ये राज्यात केवळ १२०० वनरक्षकांची नवीन पदे भरण्यात आली आहेत. सध्या राज्यात वाघ व बिबट्यांची दहशत बघता किमान १५ हजार वनरक्षकांची पदे भरणे आवश्यक आहे.
कसे पकडणार एवढे बिबटे ?
वनमंत्री गणेश नाईक यांनी पुणे, कोल्हापूर, अहिल्या नगर, नाशिकमध्ये धुमाकूळ घालणारे बिबटे पकडण्याची घोषणा केली. मात्र, वनविभागाकडे असलेले अपुरे साधने आणि मनुष्यबळाचा अभावामुळे या भागातील २ हजार बिबटे वेळेच्या आत पकडणे शक्य होणार नाही. शेड्युल १ मध्ये असलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव विभागाला केंद्रांकडून परवानगी घेणे बंधनकारक आहे. सध्या राज्याच्या २५ जिल्ह्यांमध्ये बिबट्यांची संख्या वाढलेली असून, विदर्भातील ९, पश्चिम महाराष्ट्रातील ६, मराठवाडा २, कोकण ३ आणि उर्वरित महाराष्ट्रातील ५ जिल्ह्यांचा समावेश आहे.