मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 15:09 IST2025-09-28T15:06:39+5:302025-09-28T15:09:40+5:30
Maharashtra Flood News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा विभागाकडून राज्यातील विविध भागातील धरणांच्या विसर्गस्थितीचा आढावा घेतला.

मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
Maharashtra Flood News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, धाराशिव, परभणी हे 8 जिल्हे तसेच सोलापूर येथील जिल्हाधिकार्यांशी आज सकाळी संपर्क करुन पावसाच्या, मदतकार्याच्या स्थितीचा आढावा घेतला. प्रत्येक ठिकाणी मदतकार्यात केल्या जात असलेल्या उपाययोजना जाणून घेत त्यांना काही सूचनाही केल्या. मदत शिबिरांमध्ये भोजन, पाणी आणि आरोग्याच्या योग्य व्यवस्था राखण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
काही जिल्ह्यात चारा टंचाई असल्याने तातडीने चारा पुरवण्याचेही आदेश दिले आहेत. पावसामुळे धरणांचे विसर्ग वाढविले जात असताना नागरिकांना आधीच सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यास त्यांनी सांगितले आहे. सर्व अधिकार्यांनी प्रत्यक्ष फिल्डवर राहून काम करावे, अशाही सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत.
राज्यातील विविध भागातील धरणांच्या विसर्गस्थितीचा आढावा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा विभागाकडून राज्यातील विविध भागातील धरणांच्या विसर्गस्थितीचा आढावा घेतला असून, स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधत आणि सतर्क राहून काम करण्याचे आदेश जलसंपदा विभागाला दिले आहेत. यामुळे मदत शिबिरात आधीच स्थलांतरित नागरिकांना तेथेच थांबविण्यात आले आहे. जायकवाडी प्रकल्पाच्या पाणलोट आणि धरण क्षेत्रात झालेल्या सुमारे १५० मि.मी. पावसामुळे १,२५,००० क्युसेक इतका विसर्ग गोदावरी पात्रात करण्यात येत आहे. हा विसर्ग दीड लाख क्युसेकपर्यंत जाऊ शकतो, अशी स्थिती आहे. माजलगाव धरणातून ४१,७०१ क्युसेक इतका विसर्ग केला जात आहे. हा पूर्वी ९५,००० क्युसेक इतका होता, तो आता कमी करण्यात आला आहे. धाराशिव, सोलापूर, अहिल्यानगर, बीड येथील पावसाने सीना कोळेगाव येथून ७५,००० क्युसेक विसर्ग करण्यात येत आहे. काही ठिकाणाहून तो ६०,००० क्युसेक इतकाच आहे. उजनीमधून १ लाख क्युसेक इतका विसर्ग होतो आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला सोलापूरातील परिस्थितीचा आढावा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर जिल्हाधिकार्यांकडून सोलापूर जिल्ह्यातील स्थितीचा आढावा घेतला. आतापर्यंत पुराच्या स्थितीतून ४००२ लोकांना वाचवण्यात आले असून, ६५०० लोक हे मदत शिबिरांमध्ये आहेत. तेथे भोजन, पाणी आणि आरोग्याच्या व्यवस्था करण्यात आल्या आहेत. जेथे गावांमध्येही भोजन पुरविण्याची गरज आहे, तेथे अक्षयपात्रा फाऊंडेशनचे सहकार्य प्रशासनाला होते आहे. गावांमध्ये चार्याच्या समस्या पाहता चारापुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले असून, उद्यापासून ही व्यवस्था अधिक क्षमतेने कार्यान्वित होईल. नुकसान झालेल्या घरांच्या पंचनाम्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरु असून, १० किलो तांदूळ, १० किलो गहूसह तातडीची मदत म्हणून १०,००० रुपये दिले जात आहेत. नाम फाऊंडेशन सुद्धा प्रशासनाला सहकार्य करते आहे. जिल्ह्यातील उद्योजक, मान्यवर अशा मंडळींना एकत्र करुन प्रशासनाने समन्वयातून काही नियोजन केले आहे. जिल्हास्तरिय आणि तालुकास्तरिय मदत कक्ष अशी रचना करण्यात येत आहे. उद्यापासून मोठ्या प्रमाणात आरोग्य शिबिरांचेही नियोजन स्थानिक प्रशासनाने केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला बीडमधील परिस्थितीचा आढावा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्हाधिकार्यांकडून जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. बीड जिल्ह्यातील १७ धरणे १०० टक्के भरली असून, २ धरणे ही ९० टक्क्यांच्या आसपास आहे. केवळ माजलगावमधून विसर्ग करण्यात येत आहे. वडवणी तालुक्यात काही गावांचा संपर्क तुटला आहे. तेथे आवश्यक ती मदत पुरविली जात आहे. एनडीआरएफ आणि भारतीय लष्कराचे पथक बीडमध्ये सज्ज असून, ते बचावकार्य करीत आहेत. सुमारे ४८ मंडळात काल अतिवृष्टी झाली आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले असून, परिस्थिती उद्भवल्यास त्यांना स्थानांतरित करण्यात येईल. आष्टीमधून ६० नागरिकांना सुरक्षित हलविण्यात आले आहे. सप्टेंबरपासून २५६७ कुटुंबांना सुरक्षित स्थलांतरित करावे लागले. १० लोकांना प्राण गमवावे लागले. त्यापैकी ८ कुटुंबांना आर्थिक मदत देण्यात आली आहे.