"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं"
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 08:55 IST2025-05-17T08:51:19+5:302025-05-17T08:55:13+5:30
विलिनीकरण हा विषय नाही. राज ठाकरेंनी स्वतंत्र पक्ष स्थापन केला आहे. तो चालवणे सोपे नसते. त्यांची इच्छा आहे आपण एकत्र लढावे, तर आम्हीही त्यांना प्रतिसाद दिला आहे असं संजय राऊतांनी म्हटलं.

"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं"
मुंबई - राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे हा निर्णय दोन भावांचा आहे. हा कौटुंबिक निर्णय नाही तर राजकीय निर्णय आहे. जसं ते हक्काने वर्षा बंगल्यावर जातात, तसे त्यांनी मातोश्रीवर यावे. शेवटी उद्धव ठाकरे भाऊ आहेत. तुम्ही दिलेल्या टाळीला आम्ही प्रतिसाद दिलाय असं विधान करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज-उद्धव युतीवर भाष्य केले आहे.
एका मुलाखतीत संजय राऊत म्हणाले की, जसे उद्धव ठाकरे माझे मित्र आहेत तसे प्रदीर्घ काळ राज ठाकरे हेदेखील माझे मित्र आहेत. माझ्या आयुष्यातील बराच काळ राज ठाकरेंच्या वडिलांसोबत गेलाय, राज ठाकरेंसोबत गेलाय. युतीचा निर्णय राजकीय आहे. चहा प्यायला आम्ही कधीही एकमेकांकडे जाऊ शकतो. माझ्या मुलीच्या लग्नाला ते आले थांबले. आता दोन भावांचा प्रश्न आहे. हा राजकीय प्रश्न आणि कौटुंबिक नाही. तुम्ही आमच्यासोबत यायची इच्छा व्यक्त केली त्याचे आम्ही स्वागत करतो पण ज्यांनी शिवसेना फोडली, महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला, तुम्ही त्यांच्याशी संबंध ठेवू नका जे आम्हाला अडचणीचे आहे. तेवढीच आमची भूमिका आहे असं त्यांनी म्हटलं.
तसेच खिचडी खाऊन राजकारण होत नाही. महाराष्ट्राचं आणि मराठी माणसांचे मन फार वेगळे आहे. अमित ठाकरेंच्या वेळी राज भाजपासोबत काम करत होते. आजही ते भाजपासोबतच आहे. त्यांनी भारतीय जनता पक्षाशी संबंध तोडले पाहिजेत. ते उघडपणे जात नसले तरी स्वातंत्र्य बाण्याचे आहेत. भाजपा हा महाराष्ट्राचा शत्रू आहे असं सांगत संजय राऊत यांनी राज ठाकरेंना भाजपा-शिंदेसेनेशी संबंध तोडण्याचं आवाहन केले आहे. लेट्सअप मराठीला दिलेल्या मुलाखतीत मनसे-उद्धवसेना युतीवर राऊतांनी उत्तर दिले.
दरम्यान, विलिनीकरण हा विषय नाही. राज ठाकरेंनी स्वतंत्र पक्ष स्थापन केला आहे. तो चालवणे सोपे नसते. त्यांची इच्छा आहे आपण एकत्र लढावे, तर आम्हीही त्यांना प्रतिसाद दिला आहे. भविष्यात कळेल. ज्या हक्काने ते वर्षा बंगल्यावर जात फडणवीसांशी बोलतात त्या हक्कानेच त्यांनी मातोश्रीवर यायला पाहिजे. मातोश्री राज ठाकरेंना नवीन नाही. राज ठाकरेंचे स्वागत का नाही होणार, उद्धव ठाकरे त्यांचे भाऊ आहे. ते मनाने मोठे आहेत असं विधानही संजय राऊत यांनी केले.