10 Mar, 26 05:02 PM
मुंबईच्या ओशिवरा परिसरात झोपडपट्टीला आग; दोन सिलेंडरचा स्फोट
मुंबईतील ओशिवरा परिसरात झोपट्टीला मोठी आग लागली. आगीत तीन ते चार झोपड्या जळून खाक झाल्या. अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले. झोपड्यांसह काही गोदामही जळून खाक झाली. आगीत दोन सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे.
10 Mar, 26 04:44 PM
हरिभाऊ बागडे एसएमएस रुग्णालयात दाखल
राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांना सोमवारी येथील सवाई मानसिंग रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले.
10 Mar, 26 03:25 PM
रोहित पवारांनी घेतली सोनिया गांधींची भेट, अजितदादांच्या विमान अपघातावर चर्चा
अजितदादांच्या विमान अपघाताबाबत दिल्लीत रोहित पवारांनी काही खासदारांना भेटून चर्चा केली. त्यावेळी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे यांचीही त्यांनी भेट घेतली. माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनाही भेटून अजितदादांच्या संशयास्पद विमान अपघाताचा विषय थोडक्यात समजून सांगितला अशी माहिती रोहित पवारांनी दिली.
10 Mar, 26 03:08 PM
शेतकऱ्याच्या लेकीच्या लग्नात राहुल गांधींची 'सरप्राईज' एन्ट्री
सोनिपत जिल्ह्यातील गोहाना भागातील मदिना गावात आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं. काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी अचानक एका शेतकऱ्याच्या घरी पोहोचल्यावर तेथील कुटुंबाचा आनंद द्विगुणित झाला. शेतकरी संजय मलिक यांच्या मुलीच्या लग्नात नववधूला आशीर्वाद देण्यासाठी राहुल गांधी घरी आले होते. वाचा सविस्तर
10 Mar, 26 03:01 PM
युद्धातून जीव मुठीत धरुन मायदेशी परतली उर्वशी रौतेला
इराणवर इस्रायल आणि अमेरिकेने केलेल्या हल्ल्यानंतर संपूर्ण मिडल ईस्टमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. अनेक ठिकाणी क्षेपणास्त्र डागली जात आहेत. या युद्धाच्या भीषण परिस्थितीत बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला कुवैतमध्ये अडकली होती, परंतु कसाबसा आपला जीव वाचवून ती तिथून बाहेर पडली. अभिनेत्रीने सांगितलं की, भारतात परत येताना विमानात चढताना तिला खूप भीती वाटत होती आणि तिचे डोळेही पाणावले होते. एका व्हिडिओमध्ये ती आपले अश्रू पुसतानाही दिसली. वाचा सविस्तर
10 Mar, 26 02:40 PM
विरोधकांच्या मुद्द्याला काही अर्थ नाही, त्यांना देशाची बदनामी करायची आहे - म्हस्के
विरोधक जो मुद्दा उचलताहेत त्याला काही अर्थ नाही परंतु सत्ताधारी त्यावर चर्चा करण्यास तयार आहोत. १० तासांची चर्चा आहे. ते जे मुद्दा आणत आहेत. त्यावर चर्चा करण्याऐवजी वेगवेगळ्या रितीने बाहेर विषय आणला जातो. देशाची बदनामी करणे हा त्यांचा उद्देश आहे - खासदार नरेश म्हस्के
10 Mar, 26 02:09 PM
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून महिलांसाठी 'लवकर या लवकर जा' योजनेची घोषणा
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधान परिषदेमध्ये मुंबईतील शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. लवकर या लवकर जा या संकल्पनेअंतर्गत मुंबई महानगर क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांना सकाळी ९.१५ ते ९.४५ यादरम्यान कार्यालयात लवकर येऊन जितकी मिनिटे आधी येऊन कामकाज सुरु करतील तितकीच मिनिटे संध्याकाळी कार्यालयातून लवकर निघण्याची म्हणजेत ३० मिनिटांची सवलत देण्यात येईल. या निर्णयामुळे गर्दीच्या वेळी होणारी गैरसोय नक्कीच कमी होण्यास मदत मिळेल, असे सुनेत्रा पवार म्हणाल्या.
10 Mar, 26 01:54 PM
इगतपुरीत आदिवासी संघटनांचा रास्ता रोको; मुंबई–आग्रा महामार्गावर वाहतूक विस्कळीत
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने मुंबई–आग्रा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. रास्ता रोकोमुळे मुंबई–नाशिक व नाशिक–मुंबई महामार्गावरील वाहतूक अर्ध्या तासापासून विस्कळीत झाली आहे. आदिवासींच्या आरक्षणात बंजारा व धनगर समाजाचा समावेश करू नये, तसेच आदिवासींसाठी १२,५०० पदांची विशेष भरती करावी, यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.
10 Mar, 26 01:06 PM
इराण–अमेरिका–इस्त्रायल तणावाचा स्टील उद्योगावर परिणाम; स्टील 3000 रुपयांनी महाग
जालना जिल्ह्यातील स्टील उद्योगावर मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम दिसून येत आहे. इराण आणि अमेरिका–इस्त्रायल देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे गल्फ देशांमधून भारतात आयात होणारे कच्चा माल अर्थात स्क्रॅपचे पुरवठे विस्कळीत झाले आहेत. गल्फ देशांमधून आयात होणारे स्क्रॅप सध्या थांबल्याने स्टील उत्पादनावर त्याचा थेट परिणाम झाला आहे. त्यातच कोळशाच्या दरातही वाढ झाल्याने स्टीलच्या दरात तब्बल 3000 रुपयांची वाढ झाली आहे.
10 Mar, 26 12:53 PM
मुंबई, ठाणे आणि पालघर या तीन जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटांचा इशारा
मुंबई, ठाणे आणि पालघर या तीन जिल्ह्यांना हवामान विभागाने उष्णतेच्या लाटांचा इशारा दिला आहे.
10 Mar, 26 12:50 PM
"मला लग्न करायचंय, जामीन द्या"
चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपी रितिक यादव याने आता अजब मागणी केली आहे. "मला लग्न करायचंय, जामीन द्या..." असं म्हटलं आहे. रितिकने स्वतःच्या लग्नासाठी तात्पुरता जामीन मिळण्यासाठी मकोका अंतर्गत सुनावणी करणारे न्या. सत्यनारायण नावंदर यांच्या न्यायालयात अर्ज केला. वाचा सविस्तर
10 Mar, 26 12:09 PM
पोर्श अपघात प्रकरण: अल्पवयीन मुलाच्या वडिलांना जामीन मंजूर
पोर्श अपघात प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. अल्पवयीन मुलाच्या वडिलांना जामीन मंजूर झाला आहे. विशाल अग्रवाल याला रक्ताचे नमुन्यात फेरफार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. सुप्रीम कोर्टाने अटी शर्तीसह जामीन मंजूर केला. जवळपास २२ महिन्यानंतर विशाल अग्रवालची जामीनावर सुटका करण्यात आली आहे.
10 Mar, 26 11:46 AM
ऐन तेल संकटात भारताने बांगलादेशला पाठवले ५००० टन डिझेल
इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल युद्धामुळे तेल आणि गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्याच्या झळा बसण्यास सुरूवात झाली आहे. तेल संकट गडद होत असतानाच भारत सरकारने बांगलादेशला ५००० टन डिझेल दिले आहे.
पाईपलाईनने ५००० टन डिझेल पाठवण्यात आले असून, ९०,००० डिझेल पुढील सहा महिन्यात पाठवावे लागणार आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात तेल पुरवठ्यासंदर्भात करार झाला असून, भारत पाईपलाईनद्वारे बांगलादेशला दरवर्षी १,८०,००० टन डिझेलचा पुरवठा करेन असे ठरलेले आहे.
10 Mar, 26 11:44 AM
आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय
गॅसची साठेबाजी रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून एस्मा कायदा लागू करण्यात आला आहे. मध्य पूर्वेतील तणावामुळे भारतात गॅस तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यातून केंद्र सरकारने ही खबरदारी घेतली आहे. देशात घरगुती गॅस पुरवठ्याला प्राधान्य दिले जाईल असं केंद्राने म्हटलं आहे.
10 Mar, 26 11:26 AM
मॉडेलचे क्रिकेटपटू अमित मिश्रावर आरोप
उत्तर प्रदेशातील कानपूर येथील ३५ वर्षीय मॉडेल गरिमा तिवारीने पती, आयपीएल क्रिकेटपटू अमित मिश्रा आणि त्याच्या कुटुंबीयांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. गरिमाने पतीवर हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक छळ, मारहाण आणि आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचे गंभीर आरोप केले आहेत. २०२१ मध्ये विवाहबंधनात अडकलेल्या या जोडप्याचा वाद आता कोर्टात पोहोचला आहे. वाचा सविस्तर...
10 Mar, 26 10:53 AM
राज्यातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी ऑटो परवाने तात्पुरते स्थगित
पुणे : शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, सोमवारी (दि. ९) राज्यभर नवीन ऑटो रिक्षांना परवाने देण्यास तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी याबाबत घोषणा केली.
10 Mar, 26 10:44 AM
जळगाव- चोपडा नगरपरिषदेची कर वसुली मोहीम
जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे मार्च महिना सुरू होताच नगरपरिषदेच्या वतीने मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुली मोहिमेला वेग आला आहे. चोपडा नगर परिषद प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील नागरिकांकडून आतापर्यंत सुमारे 70 टक्के मालमत्ता कर आणि पाणीपट्टीची वसुली करण्यात आली आहे. ज्यांच्याकडे मालमत्ता कर, पाणीपट्टी तसेच गाळे भाडे थकबाकी आहे अशा नागरिकांना नोटीस देण्यात आली आहे.
10 Mar, 26 10:08 AM
न्याय व्यवस्थेत भ्रष्टाचाराचे प्रकरण, NCERTचा माफीनामा
एनसीईआरटीने इयत्ता आठवीच्या अभ्यासक्रमातील एका पुस्तकात न्याय व्यवस्थेतील भ्रष्टाचाराचे वादग्रस्त प्रकरण हटवले आहे. या प्रकाराबद्दल जाहीर माफीही मागितली आहे.
"राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने अलिकडेच समाज शास्त्र पुस्तकात समाजाचा शोध: भारत आणि त्याच्या कक्षा' या प्रकरणात चौथ्या पाठ्यक्रमात समाजातील न्याय व्यवस्थेची भूमिका याचा समावेश केला गेला होता. एनसीईआरटीचे संचालक, सदस्य या प्रकरणाबद्दल बिनशर्थ माफी मागत आहोत. हे संपूर्ण पुस्तक परत घेण्यात आले आहे आणि बाजारात उपलब्ध नाहीये.", असे एनसीईआरटीने म्हटले आहे.
10 Mar, 26 09:59 AM
माझी चूक असेल, तर मला कठोर शिक्षा करा! सीआयडी चौकशीत व्ही. के. सिंग यांचा जबाब
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती जवळ झालेल्या विमान अपघातप्रकरणी पायलट सुमित कपूर याची चूक आहे. यात माझी काही चूक असेल, तर मला कठोर शिक्षा करा, असा धक्कादायक जबाब व्हीएसआर या विमान कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांनी दिला आहे. त्यांची सीआयडी चौकशी सुरू आहे. (सविस्तर वाचा)
10 Mar, 26 09:30 AM
पाकिस्तानने बंद केली शाळा, कॉलेज
ईराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे शेजारील देश पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. होर्मुज सामुद्रधुनीतील संकट आणि इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्था कोलमडण्याची चिन्हे असून, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी देशात आणीबाणी जाहीर केली आहे. (सविस्तर वाचा)
10 Mar, 26 09:22 AM
मुंबईतील हॉटेल, रेस्टॉरंट उद्यापासून बंद होणार
मध्य आशियातील वाढत्या तणावाचा आणि ईराण युद्धाचा मोठा फटका भारतीय हॉटेल उद्योगाला बसला आहे. मुंबई, चेन्नई आणि बेंगळुरूमध्ये कमर्शियल एलपीजी सिलिंडरचा पुरवठा अचानक खंडित झाल्याने हजारो हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स संकटात सापडले आहेत. बेंगळुरू हॉटेल असोसिएशनने तर मंगळवारपासून (१० मार्च) हॉटेल्स बंद ठेवण्याचे संकेत दिले आहेत. (सविस्तर वाचा)
10 Mar, 26 09:20 AM
इराण युद्ध जवळजवळ संपले
मागील काही दिवसांपासून मध्य पूर्वेत तणाव सुरू आहे.अमेरिका आणि इस्त्रायलने इराणवर हल्ले केले, या हल्ल्यात इराणचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचे युद्ध लवकरच संपणार असल्याचे संकेत दिले. पण यामध्ये त्यांनी कालावधी सांगितला नाही. "आम्ही हे देखील संपवण्याच्या अगदी जवळ आहोत." मी कोणत्याही दहशतवादी राजवटीला जगाला ओलीस ठेवू देणार नाही आणि जागतिक तेल पुरवठा खंडित करण्याचा प्रयत्न करू देणार नाही. जर इराणने असे काही केले तर त्यांना यापेक्षाही कठोर शिक्षा भोगावी लागेल, असा इशाराही ट्रम्प यांनी दिला. (सविस्तर वाचा)