Maharashtra Budget Session: "राज्याच्या अर्थव्यवस्थेने पार केला अर्धा ट्रिलियनचा टप्पा", मुख्यमंत्र्यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 05:31 IST2026-02-27T05:29:51+5:302026-02-27T05:31:03+5:30
२०२९ पर्यंत अर्थव्यवस्था पोहोचणार ट्रिलियनवर; विरोधक संभ्रमित असल्याची टीका करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, २०२९ नंतरही आम्हीच सत्तेत येणार.

Maharashtra Budget Session: "राज्याच्या अर्थव्यवस्थेने पार केला अर्धा ट्रिलियनचा टप्पा", मुख्यमंत्र्यांची माहिती
मुंबई : अर्थव्यवस्थेने अर्धा ट्रिलियनचा टप्पा पार केलेले महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे. २०१२-१३ साली आपली अर्थव्यवस्था १३ लाख कोटींची होती. गेल्या ११ वर्षात ती ५१ लाख कोटींवर गेली आहे. ५०० बिलियनचा (अर्धा ट्रिलियन) टप्पा पार करून ६६० बिलियनवर (५१ लाख कोटी) आपली अर्थव्यवस्था पोहोचली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना विधानसभेत गुरुवारी दिली.
ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करण्यासाठी आपण २०३२ सालाचे उद्दिष्ट ठेवले आहे; मात्र हा टप्पा २०२९ पर्यतच गाठायचा आहे. २०५७ पर्यंत पाच ट्रिलियन अर्थव्यवस्था, दरवर्षी १० लाख रोजगार निर्मिती, दरडोई उत्पन्नात १० पट वाढ करायची आहे. आज बेल्जियम देशाइतकी आपली अर्थव्यवस्था आहे. ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था झाली, तर जगातील १३-१४वी अर्थव्यवस्था आपल्या राज्याची होईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
विरोधी पक्ष भ्रमित आणि संभ्रमित आहे, अशी टीका करत त्यांनी संभ्रमात राहण्यापेक्षा संभ्रमातून बाहेर राहण्यापेक्षा संभ्रमातून बाहेर पडण्यासाठी शांतपणे विचार करावा, असा खोचक टोलाही त्यांनी अभिभाषणावर विरोधकांनी मांडलेल्या मुद्द्यांना उत्तर देताना लगावला.
नाशिकचे जगात ब्रडिंग
कुंभमेळा दर साडे बारा वर्षांनी येणारा जगातील एकमेव हेरिटेज मेळा आहे. सर्व धर्मातील पंथांचे लोक इथे येतात. प्रयागराजमध्ये जो कुंभमेळा झाला तिथे त्यांनी गुंतवणूक केली त्यापेक्षा त्यांना जास्त परतावा मिळाला. आपणही जो खर्च करतो आहे तो केवळ कुंभमेळ्यावर नाही, तर यातून गोदावरी नदीची स्वच्छता आणि नाशिक हे शाश्वत शहर म्हणून विकसित करत आहोत. एका कुंभमेळ्याने उत्तर प्रदेशचे ब्रँडिंग जगात झाले, आपल्यालाही नाशिकचे बँडिंग कुंभमेळ्याच्या माध्यमातून जगात करायचे आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
बेरोजगारीचा दर ३.१ टक्केच
महाराष्ट्रात बेरोजगारीचा दर ११.७ टक्के असल्याचे विरोधक म्हणत आहेत; पण सातत्याने हा दर खाली आणतो आहोत. बेरोजगारीचा दर २०२१-२२ साली ४ टक्के, २०२३-२४ साली ३.३ टक्के आणि २०२५ साली ३.१ टक्के इतका असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
सरकारी नियुक्त्यांचा आकडा दीड लाखापर्यंत
सन २०२२ साली आम्ही ७५ हजार रोजगार देऊ सांगितले होते; पण महायुतीचे सरकार आल्यापासून राज्यात १ लाख २० हजार ४४९ लोकांना नियुक्त्या दिल्या आहेत.
अजून काही नियुक्तीपत्र देणे 3 शिल्लक आहे, दोन महिन्यांत ती दिल्यानंतर हा आकडा दीड लाखापर्यंत जाईल, असे सांगत नव्याने भरतीचे सत्रही आम्ही सुरू करणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
'आमचे व्हिजन डॉक्युमेंट विरोधकांनी वाचावे'
मुख्यमंत्री म्हणाले, २०२९, २०३४ आणि २०४७ अशा तीन टप्प्यांचा उल्लेख व्हिजन डॉक्युमेंटमध्ये असून तसे नियोजन आम्ही केले आहे. विरोधकांनी आमचे विकसित महाराष्ट्राचे डॉक्युमेंट वाचले तर त्यांना हे लक्षात येईल. २०२९ नंतर पुढच्या टर्मला आम्हीच पुन्हा सत्तेत येऊ, असेही ते यावेळी म्हणाले.