Maharashtra Budget: महाराष्ट्राचा अर्थसंकल्प २०२६; पर्यटन क्षेत्रासाठी मुख्यमंत्र्यांनी काय घोषणा केली?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 15:22 IST2026-03-06T15:21:24+5:302026-03-06T15:22:50+5:30
Maharashtra Budget 2026: राज्याचे मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत २०२६-२७ या वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला.

Maharashtra Budget: महाराष्ट्राचा अर्थसंकल्प २०२६; पर्यटन क्षेत्रासाठी मुख्यमंत्र्यांनी काय घोषणा केली?
राज्याचे मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत २०२६-२७ या वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात फडणवीस यांनी पर्यटन क्षेत्रासाठी मोठी तिजोरी उघडली असून, महाराष्ट्राला जागतिक पर्यटन नकाशावर अधिक ठळकपणे स्थान मिळवून देण्यासाठी अनेक महत्त्वाकांक्षी घोषणा केल्या आहेत.
राज्यात पर्यटनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करण्यावर भर देण्यात आला आहे. फडणवीस म्हणाले की, "राज्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या २०२७ पर्यंत वार्षिक १६ कोटींवरून ३८ कोटींपर्यंत नेण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. यासाठी मुंबईसह दुबई आणि सिंगापूर येथे विशेष पर्यटन गुंतवणूक केंद्रे सुरू केली जातील. याद्वारे जागतिक गुंतवणूकदारांना आकर्षित करून राज्यात जागतिक दर्जाचे पर्यटन परिपथ विकसित केले जातील. तसेच, राज्यातील पर्यटनाचा अनुभव १०० टक्के डिजिटल करण्यावर सरकारचा भर असेल."
फडणवीस पुढे म्हणाले की, "महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. या निमित्ताने राज्यातील निवडक ५० पर्यटन स्थळांच्या पायाभूत सुविधांचे अत्याधुनिकरण करण्यासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून प्राधान्याने निधी दिला जाईल. सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या रांगांमध्ये असलेला ऐतिहासिक वासोटा किल्ला पर्यटकांना अधिक सुलभ आणि सुरक्षितपणे पाहता यावा, यासाठी तिथे रोपवे प्रकल्प उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे."
विदर्भासाठी मोठी घोषणा करताना फडणवीस यांनी सांगितले की, "कोल्हापूर आणि मुंबईनंतर आता राज्यातील तिसरी चित्रनगरी नागपूर जिल्ह्यातील रामटेक (नवरगाव) येथे विकसित केली जाईल. रामटेक येथे रामसृष्टी आणि कालिदास सृष्टी उभारली जाणार आहे. महाकवी कालिदास यांचे जीवनचरित्र नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी चित्रपट निर्मितीलाही राज्य सरकारकडून सहकार्य करण्यात येईल."
धार्मिक पर्यटनाला गती देण्यासाठी सरकारने मोठी पावले उचलली आहेत. राज्यातील पाचही ज्योतिर्लिंगांच्या विकास आराखड्याची वेगवान अंमलबजावणी करण्यासाठी ५ वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर विकास आराखड्याचा पहिला टप्पा पूर्णत्वाकडे असून पुढील कामांचे नियोजन सुरू आहे. तर, नाशिकमधील रामकाल पथ विकास प्रकल्पाची कामे प्रगतीपथावर आहेत. याचबरोबर महानुभाव पंथीयांच्या विविध धार्मिक स्थळांवरील पायाभूत सुविधांसाठीही आवश्यक निधीची तरतूद करण्यात आली आहे.