शेतकऱ्यांचे दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ; अर्थसंकल्पात मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 05:21 IST2026-03-07T05:21:31+5:302026-03-07T05:21:54+5:30
Maharashtra Budget 2026 Marathi: विकसित महाराष्ट्राचा अर्थसंकल्प : प्रगतिशील, शाश्वत, सर्वसमावेशक, सुशासन या चार स्तंभांवर साधणार विकास; लाडकी बहीण योजनेसाठी भरीव तरतूद; स्टार्टअप, युनिकॉर्नमध्ये महाराष्ट्र नंबर १, पाच वर्षांत एक लाख २५ हजार उद्याेजक घडविणार, ग्रामीण भागात २३ हजार किलोमीटर लांबीचे रस्ते उभारणार, ४० हजार काेटींची महसुली तूट

शेतकऱ्यांचे दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ; अर्थसंकल्पात मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला. ३० सप्टेंबर २०२५ रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी मांडलेल्या अर्थसंकल्पात जाहीर केली.
कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन रक्कम दिली जाईल, असेही त्यांनी जाहीर केले. विधानपरिषदेत वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी अर्थसंकल्प मांडला. शेतकरी सातत्याने कर्जबाजारी होऊ नये म्हणून अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना सुचविण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘मित्रा’ या शासकीय संस्थेचे अध्यक्ष प्रवीणसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीच्या प्राथमिक अहवालाच्या आधारे फडणवीस यांनी कर्जमाफीसंबंधीची घोषणा केली. परदेशी समितीच्या शिफारशीनुसार दीर्घकालीन उपाययोजनाही करण्यात येतील, अशी ग्वाही फडणवीस यांनी यावेळी दिली.
पात्र शेतकरी कोण?
दोन लाखांपर्यंतच्या कर्जमाफीचे पात्र शेतकरी कोण असतील हे स्पष्ट केलेले नाही. त्यासाठीचा आदेश लवकरच काढला जाईल. मात्र, याआधीच्या कर्जमाफीच्या लाभासाठी आमदार, खासदार, मंत्री, नगरसेवक, जिल्हा परिषदांचे पदाधिकारी, सदस्य हे पात्र नव्हते. शासकीय तिजोरीतून वेतन घेणारेही अपात्र ठरविण्यात आले होते. तसेच प्राप्तिकर भरणाऱ्यांनाही लाभ देण्यात आला नव्हता.
जुनी वाहने मोडीत काढून नवे खरेदी करणाऱ्यांना मिळेल करसवलत
जुने वाहन मोडीत काढून त्याऐवजी नवे वाहन विकत घेणाऱ्यांना करसवलतची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. तर दुसरीकडे जुन्या वाहनांवर आकारला जाणारा पर्यावरण कर मात्र दुप्पट करण्यात आला आहे.
आठ वर्षांत ४४ हजार कोटींची माफी
२०१७ पासून २०२२ पर्यंतच्या ६ वर्षांच्या काळात राज्य सरकारने शेतकऱ्यांना विविध योजनांतर्गत ४४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली आहे. ती रक्कम आज जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या घोषणेव्यतिरिक्त आहे.
१ ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे वाटचाल
२०४७ पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर्सची करणार
शेतीचा जीडीपी ५५ अब्ज डॉलर्सवरुन ५०० अब्ज डॉलर्सवर नेणार
उद्योग क्षेत्राचे स्थूल उत्पन्न १२३ अब्ज डॉलर्सवरून १,५०० अब्ज डॉलर्सवर नेणार
सेवा क्षेत्राचे स्थूल उत्पन्न ३१२ अब्जवरुन ३,००० अब्ज डॉलर्सवर नेण्याचे उद्दिष्ट
डोळ्यांत स्वप्ने, पायी खाचखळगे
उज्ज्वल भविष्य, स्वप्नपूर्तीचे क्षितिज खुणावत असताना वाट खडतर आहे, पायात खाचखळगे आहेत, म्हणून कोणी चालणे सोडत नाही ना ! - संपादकीय