पार्थ पवारांनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट; 'शिवतीर्थ'वर दीड तास खलबतं, काय झाली चर्चा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 13:27 IST2026-03-30T13:26:43+5:302026-03-30T13:27:59+5:30
राज ठाकरे यांनी अजितदादांच्या अपघातानंतर राष्ट्रवादीत सुरू असलेल्या घडामोडीवर थेट भाष्य केले होते.

पार्थ पवारांनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट; 'शिवतीर्थ'वर दीड तास खलबतं, काय झाली चर्चा?
मुंबई - महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक मोठी घडामोड पाहायला मिळाली आहे. दिवंगत अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घ्यायला दादर येथील शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झाले. पार्थ पवार अचानक राज ठाकरे यांच्या भेटीला पोहचल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
काही दिवसांपूर्वी आमदार रोहित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीत अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत चर्चा झाली. त्यानंतर राज यांनीही पत्रकार परिषद घेत अजितदादांच्या विमान अपघातावरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. अजितदादांसारख्या माणसाचा अपघात होतो आणि सरकार साधा गुन्हा नोंद करत नाही. FIR का नोंदवला जात नाही असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला होता. त्यानंतर आज पार्थ पवार राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थला दाखल झाले. या दोन्ही नेत्यांची भेट का झाली याबाबत स्पष्टता नाही. राज ठाकरे यांच्या भेटीनंतर पार्थ पवार काहीही प्रतिक्रिया न देता शिवतीर्थ निवासस्थानावरून निघून गेले. त्यामुळे या भेटीमागचं कारण गुलदस्त्यात आहे.
२ एप्रिल रोजी राज्यसभेच्या ७ जागा रिक्त होत आहेत. त्यातील एका जागेवर पार्थ पवार यांना पक्षाकडून संधी देण्यात आली आहे. पार्थ पवार यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड होणार आहे. त्यानंतर पहिल्यांदाच पार्थ पवार राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले आहेत. जवळपास दीड तास पार्थ पवार हे शिवतीर्थ निवासस्थानी होते. त्यामुळे या भेटीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. अजित पवारांचा विमान अपघात आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घडलेल्या घडामोडीनंतर पार्थ पवार राजकारणात सक्रीय झाल्याचे दिसून येते.
विशेष म्हणजे राज ठाकरे यांनी अजितदादांच्या अपघातानंतर राष्ट्रवादीत सुरू असलेल्या घडामोडीवर थेट भाष्य केले होते. मंत्री पीयूष गोयल यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी प्रफुल पटेल यांची निवड झाल्याचा दावा केला. त्यानंतर राज ठाकरे यांनी लगेच राष्ट्रवादीसारख्या मराठमोळ्या पक्षाचा अध्यक्ष मराठीच असावा, तो पाटील असावा पटेल नाही अशी भूमिका घेतली होती. त्यानंतर सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली. त्यानंतर रोहित पवारांच्या भेटीनंतर राज ठाकरे यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली होती. त्यामुळे पार्थ पवार आणि राज ठाकरे यांची भेट महत्त्वाची मानली जाते.