‘अजितदादांसोबत माझं ३५ वर्षांचं जीवाभावाचं नातं, अनेक घटनांचा मी साक्षीदार, योग्यवेळी योग्य ते बोलेन’, सुनील तटकरेंचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 15:36 IST2026-03-31T15:34:23+5:302026-03-31T15:36:27+5:30
Sunil Tatkare News: दादांचं गेली ३५ वर्ष जीवाभावाचं नातं राहिलं आहे. अनेक घटनांचा मी साक्षीदार आहे. आता दादांच्या स्वप्नातील पक्ष त्याच ताकदीने पुढे नेण्याचे काम आमचे सर्वांचे आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.

‘अजितदादांसोबत माझं ३५ वर्षांचं जीवाभावाचं नातं, अनेक घटनांचा मी साक्षीदार, योग्यवेळी योग्य ते बोलेन’, सुनील तटकरेंचा इशारा
मुंबई - दादांचं गेली ३५ वर्ष जीवाभावाचं नातं राहिलं आहे. अनेक घटनांचा मी साक्षीदार आहे. आता दादांच्या स्वप्नातील पक्ष त्याच ताकदीने पुढे नेण्याचे काम आमचे सर्वांचे आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.
सुनील तटकरे म्हणाले की, दादांनी ज्या कठोर परिश्रमातून एनडीएसोबत जाण्याची क्षमता प्रखरतेने दाखवली होती. आत्मविश्वासाने दाखवली होती. मात्र लोकसभेच्या पराभवानंतर विधानसभा निवडणुकीत पुन्हा ज्या आत्मविश्वासाने दादांनी पक्षाचे संघटन आम्हा सर्व सहकार्यांना विश्वासात घेऊन उभे केले त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा ७२ टक्के स्ट्राईक रेट राहिला होता. दादांच्या जाण्याने आमच्यावर जो प्रसंग आला आहे त्यात आम्ही हळवे झालो आहोत आमच्या मनातील संवेदना जागृत आहेत. दादांचं गेली ३५ वर्ष जीवाभावाचं नातं राहिलं आहे. अनेक घटनांचा मी साक्षीदार आहे. अनेक विषयांवर आम्ही बोललो आहोत, त्यामुळेच दादांच्या स्वप्नातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुनेत्रावहिनींच्या नेतृत्वाखाली पुढे नेणे आम्हा सर्वांचे काम आहे. ते आम्ही नेटाने करू, असे सुनील तटकरे यांनी विरोधकांना सांगितले आहे.
ते पुढे म्हणाले की, आमचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी पक्षाची घटना आणि त्यातील कलमे याबद्दल अधिकृत आणि सविस्तर माहिती कागदपत्रांसह आपल्यासमोर ठेवली आहे. त्यामुळे मला त्या विषयावर अधिक काही बोलायचे नाही. पण योग्यवेळी योग्य ते बोलेन, असेही सुनील तटकरे यांनी सांगितले. तसेच सुनेत्रा वहिनी आमच्या पक्षाच्या अध्यक्षा आहेत. त्यामुळे आम्ही सर्व नेते एकत्र बसून निर्णय घेऊ, आपणाला चिंता करण्याची गरज नाही, असेही त्यांनी यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना उद्देशून सांगितले.