Shaktipeeth Highway: जिल्हा परिषद निवडणुकीनंतर सरकार शक्तिपीठ महामार्गाचे काम सुरू करेल - सतेज पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 20:00 IST2025-11-10T19:58:37+5:302025-11-10T20:00:33+5:30
कागल येथे काँगेसच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

Shaktipeeth Highway: जिल्हा परिषद निवडणुकीनंतर सरकार शक्तिपीठ महामार्गाचे काम सुरू करेल - सतेज पाटील
कागल : महायुती सरकारकडे लोकांना देण्यासाठी पैसे नाहीत. यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे रोज बाहेर येत आहेत. भ्रष्टाचाराला पाठीशी घालणारे हे सरकार आहे. शक्तिपीठ महामार्ग रद्द करीत असल्याचे सांगितले जात असले तरी जिल्हा परिषद निवडणुकांनंतर ही मंडळी शक्तीपीठ महामार्गाचे काम सुरु करतील, अशी टीका आमदार सतेज पाटील यांनी केली.
कागल येथील दुधगंगा धरणग्रस्त वसाहतीत काँगेस किसान सेलच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन खासदार शाहू छत्रपती व आमदार पाटील यांच्या हस्ते केले. या वेळी ते बोलत होते. बी. एम. संदीप, गोकुळचे संचालक प्रकाश पाटील, शशिकांत खोत, काॅ. शिवाजी मगदूम, इगल प्रभावळकर, ठाकरे गटाचे दिलीप पाटील, अक्षय कांबळे, रणजित पाटील, अनिल पाटील, संदीप चौगुले, विनय घोरपडे, संजय वाईकर आदी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, कागल तालुका पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता.आता पुन्हा एकदा हा पक्ष तालुक्यात चांगल्या पद्धतीने वाढेल. किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सागर कोंडेकर यांनी प्रास्ताविक केले. तालुकाध्यक्ष दयानंद पाटील नंद्याळकर, बी. एम. संदीप यांची भाषणे झाली. राजेंद्र बागल यांनी आभार मानले.
कागलची जनता काँग्रेसबरोबर
खासदार शाहू छत्रपती म्हणाले, लोकसभा निवडणुकीत मला कागल तालुक्यात चांगले मतदान झाले, असे म्हटले जात होते. सर्व नेते एका बाजूला असतानाही केवळ दहा हजार मते कमी पडली. जनतेने माझ्यावर व पक्षावर विश्वास दाखविला.
मुश्रीफ - घाटगेंचा उल्लेख नाही
नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आमदार पाटील हे काहीतरी राजकीय बोलतील, अशी अपेक्षा होती. पण त्यांनी मंत्री हसन मुश्रीफ व महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे समरजित घाटगे यांच्याबद्दल कोणतेही भाष्य केले नाही.