मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 13:12 IST2026-04-30T13:11:11+5:302026-04-30T13:12:05+5:30
भविष्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करू. फक्त आमदारकीसाठी नव्हे तर सामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्यासाठी आज शिवसेनेत प्रवेश करत आहे असं बच्चू कडू यांनी सांगितले.

मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
मुंबई - विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठी घडामोड घडली आहे. प्रहार संघटनेचे नेते माजी मंत्री बच्चू कडू यांनी प्रहार संघटना शिवसेनेत विलीनीकरण करत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला आहे. बच्चू कडू यांनी शिवसेनेत प्रवेश करावा, त्यानंतर त्यांना विधान परिषदेची संधी देऊ अशी अट घालण्यात आली होती. यावर कार्यकर्त्यांशी चर्चा करून शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेण्याचा निर्णय बच्चू कडू यांनी घेतला आहे.
मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बच्चू कडू यांनी पक्षात प्रवेश घेतला आहे. यापुढे प्रहार संघटना सामाजिक संघटना म्हणून कार्यरत राहील आणि शिवसेनेच्या माध्यमातून शेतकरी, दिव्यांग यांच्या प्रश्नांसाठी काम करू. भविष्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करू. फक्त आमदारकीसाठी नव्हे तर सामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्यासाठी आज शिवसेनेत प्रवेश करत आहे. आमचा झेंडा बदलला असला तरी अजेंडा तोच आहे. शिवसेनेचे राजकारण आणखी मजबूत करू. राज्याच्या कानाकोपऱ्यात शिवसैनिक उभा करू असा शब्द बच्चू कडू यांनी पक्षप्रवेशावेळी दिला.
तर एक कडवट कार्यकर्ता, सर्वसामान्यांसाठी झटणारा, दिव्यांगासाठी लढणारा आंदोलक नेता म्हणून बच्चू कडू यांची ओळख आहे. बच्चू कडू यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. जेव्हा जेव्हा आंदोलन मोर्चे निघाले तेव्हा त्यांची ताकद पाहिली. शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढला, कर्जमाफीचा निर्णय घेऊन त्या आंदोलनाला यश आले. दिव्यांगासाठी खऱ्या अर्थाने लढणारा, झटणारा नेता म्हणून बच्चू कडू यांची ओळख आहे. आज त्यांचे शिवसेनेत स्वागत करतो. बच्चू कडू मूळचे शिवसैनिकच आहेत. २५ वर्ष प्रहार संघटनेचे काम केले आणि त्यानंतर आज पुन्हा स्वगृही बच्चू कडू आलेत. मुद्दे, ध्येयधोरणे, गोरगरिबांना न्याय देणारे प्रश्न सोडवण्यासाठी कुठेतरी सत्तेचे बळ लागते. बच्चू कडू आणि शिवसेना समीकरण नवीन नाही. लढवय्या कार्यकर्ता आज आपल्यात आलेत. आपली लढाई विचारांची आहे. सर्वसामान्य माणसांना न्याय मिळवून देण्याची भूमिका माझीही आणि त्यांचीही आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा होतो असं सांगत एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू यांचे पक्षात स्वागत केले.
दरम्यान, संपूर्ण महाराष्ट्रात जिथे शिवसेना वाढवण्याचं काम करता येईल तिथे बच्चू कडू करतील. प्रहार संघटनेलाही सामाजिक कार्यात बळ मिळेल. प्रहार सामाजिक संघटना म्हणून काम करेल. मी मुख्यमंत्री असताना दिव्यांग मंत्रालय सुरू केले. त्याचा फायदा त्यांना होतोय. गोरगरिबांचे प्रश्न तुम्ही हाती घ्या, एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी उभा आहे. मी एकदा वचन दिले तर कायम असते. राजकारणात शब्द देणे आणि पाळणे महत्त्वाचे असते. म्हणूनच राज्यात चांदा ते बांदा पोहचवण्याचं काम मी करतोय. आता बच्चू कडूसोबत आलेत. दिव्यांगाचा आशीर्वाद आपल्याला मिळेल. तुम्ही ज्या विश्वासाने आलात, त्याला तडा जाणार नाही याची ग्वाही देतो. महाराष्ट्रातील गावाखेड्यात सगळीकडे शिवसेना मजबूत करण्याचं काम आपण करू. गाव तिथे शिवसेना, घर तिथे शिवसैनिक अभियान जोमाने करू असं एकनाथ शिंदे यांनी कडू यांच्या पक्षप्रवेशावेळी त्यांनी सांगितले.