शेतकऱ्यांनी प्रदीर्घ लढाई जिंकली; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानं उपमुख्यमंत्री अजित पवार भारावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 15:23 IST2021-12-16T15:17:51+5:302021-12-16T15:23:35+5:30
बैलगाडा शर्यती आता राज्यात पुन्हा सुरु होतील. मात्र शेतकऱ्यांनी सर्व अटी, नियमांचे पालन करण्याचे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

शेतकऱ्यांनी प्रदीर्घ लढाई जिंकली; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानं उपमुख्यमंत्री अजित पवार भारावले
मुंबई - राज्यातील बैलगाडा शर्यतींवरची (Bullock cart race) बंदी उठविण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्वागत केले असून हा निर्णय राज्यातल्या शेतकऱ्यांच्या हिताचा आणि पशुधनाचं संरक्षण, संवर्धन करणारा ठरेल. या निर्णयाने बैलधारक शेतकऱ्यांनी प्रदीर्घ लढाई जिंकली आहे. हा राज्यातल्या शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.
या लढाईत शरद पवारांनी लक्ष घातलं. मंत्री दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे यांच्यासारख्या नेत्यांनी आणि अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी ही लढाई ध्येयनिष्ठेने, संपूर्ण ताकदीने लढली. या लढाईत सहभागी सर्व नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे मी अभिनंदन करतो. आभार मानतो. महाविकास आघाडी सरकारने सर्वशक्तीनिशी या न्यायालयीन लढाईला बळ दिले. त्यातून मिळालेले हे यश राज्यातल्या शेतकऱ्यांमध्ये नवीन उत्साह निर्माण करेल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला आनंद व्यक्त केला आहे.
बैलगाडा शर्यती आता राज्यात पुन्हा सुरु होतील. मात्र शेतकऱ्यांनी सर्व अटी, नियमांचे पालन करण्याचे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. याच वेळी, सर्वोच्च न्यायालयाने बंदी उठवण्यासंदर्भात आज दिलेल्या निर्णयावर पुन्हा घटनापीठ विचार करणार असले तरी, तिथेही शेतकऱ्यांचाच विजय होईल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.