"भोंदूबाबा प्रकरणाची वरवरची चौकशी नको, अशोक खरातची नार्को टेस्ट करा; अघोरी पूजा... "
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 18:21 IST2026-04-01T18:21:15+5:302026-04-01T18:21:15+5:30
Ashok Kharat : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीच्या नावाखाली मलमपट्टी न करता अशोक खरातची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

"भोंदूबाबा प्रकरणाची वरवरची चौकशी नको, अशोक खरातची नार्को टेस्ट करा; अघोरी पूजा... "
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण अत्यंत गंभीर असून या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन चौकशी केली तरच यातील अनेकांचे खरे चेहरे उघडे पडतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीच्या नावाखाली मलमपट्टी न करता अशोक खरातची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
महायुती सरकारमधील अनेक मंत्री, आमदार यांनी अशोक खरातकडून पुजा करून घेतल्या आहेत, त्याचे तीर्थ घेतले आहे. राज्यात अंधश्रद्धा विरोधी कायदा असताना राज्यातील मंत्रीच जर अशा प्रकारे अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचे उद्योग करत असतील तर पुरोगामी महाराष्ट्राला ते शोभणारे नाही. हा प्रकार संविधानाची पायमल्ली करणारा आहे म्हणून अशोक खरातच्या दरबारात ज्या मंत्री, आमदार, नेत्यांनी हजेरी लावून त्याचा लाभ घेतला, त्या सर्वांवर अंधश्रद्धा विरोधी कायद्यानुसार गुन्हे दाखल करावेत, असंही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
गुप्तधनाचा मोह, प्रगतीची आस; संकटातून बाहेर पडण्यासाठी महिला भोंदू अशोक खरातच्या जाळ्यात
"कारवाई झाली पाहिजे"
अजित पवार यांच्या संदर्भातील प्रश्नावर बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, अजित पवार यांच्या फोटोवर अशोक खरातने फुली मारली होती अशी माहिती समोर येत आहे, हा प्रकार अतिरेकी त्यांच्या टार्गेटवर फुली मारतात तसाच आहे. तसेच अजित पवार यांच्या बंगल्याबाहेरही काही तरी अघोरी पुजा केल्याचा प्रकार उघड झाला होता. कोणाची खुर्ची खाली करावी व कोणाला त्या खुर्चीवर बसवावं यासाठी सुद्धा अघोरी पूजा केल्याचं समजतं, हे सर्व गंभीर असून त्यावर कारवाई झाली पाहिजे, असंही सपकाळ म्हणाले.
भोंदूबाबा अशोक खरातने शेतकऱ्याची १० कोटींची जमीन हडपली; सावकारीचा धंदा जोरात
"नोबल पारितोषिक देऊन सन्मान केला पाहिजे"
मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी जैन मुनींच्या आशिर्वादाने गळा ठीक झाल्याच्या वक्तव्याबद्द विचारलेल्या प्रश्नावर देखील सपकाळ यांनी प्रतिक्रिया दिली आह., महापौर रितु तावडे यांनी नवा शोध लावला आहे, याबदद्ल त्यांना नोबल पारितोषिक देऊन सन्मान केला पाहिजे, असं देखील सपकाळ म्हणाले.