गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार दिसून येत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा महाराष्ट्राला सर्वाधिक फटका बसला होता. परंतु त्या तुलनेनं आता राज्यातील रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यांत ९ हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर साडेआठ हजारांपेक्षा अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
राज्यात गेल्या चोवीस तासांत ९ हजार १९५ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली असून ८ हजार ६३४ रूग्ण करोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत ५८,२८,५३५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर दुसरीकडे राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर आता ९६.०१ टक्के इतका झाला आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये राज्यात २५२ कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली.
मुंबईत ६६१ रुग्णांची नोंद
गेल्या चोवीस तासांमध्ये मुंबईत ६६१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर दुसरीकडे राज्यात ४८९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर आता ९६ टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईत सध्या ८४९८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर दुसरीकडे मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी आता ७३३ दिवसांवर पोहोचला आहे.