लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दुर्गम भागातील भीषण परिस्थिती, विदर्भातील पाणीटंचाई आणि शेतकऱ्यांच्या सातत्याने होणाऱ्या आत्महत्या पाहून मन विदीर्ण होते. हे सगळे थांबविण्यासाठी मी आता महाराष्ट्र सोडून निघून जाऊ का?, असा भावुक सवाल प्रसिद्ध अभिनेते व ‘नाम फाउंडेशन’चे अध्यक्ष नाना पाटेकर यांनी उपस्थित केला. मतभेद विसरून एकत्र येऊन जलसंधारणाची चळवळ वाढवा, असे आवाहनही त्यांनी केले.
पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त सोमवारी रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित जलक्रांती परिषदेत ते बोलत होते.
व्यासपीठावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मृदा व जलसंधारणमंत्री संजय राठोड, महापौर नीता ठाकरे, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, ॲड. आशिष जयस्वाल, खासदार माया इवनाते उपस्थित होते.
केवळ भाषणबाजी नको, कृती करा
मला शहरात राहणे असह्य होते, तिथल्या सिमेंटच्या भिंती कबरीसारख्या वाटतात, असे सांगत निसर्गाने दिलेल्या मोफत श्वासाचे भान ठेवून आता गावागावांत भटकून काम करायचे आहे, असे नाना पाटेकर म्हणाले. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाचे नाही; सामाजिक प्रश्न सोडवताना आपण सर्व एक नागरिक आहोत, असे स्पष्ट करत त्यांनी केवळ भाषणबाजी नको, कृती करा, असे आवाहन केले.
शेतकऱ्याला किडनी विकावी लागणे दुर्दैव : अनासपुरे
मकरंद अनासपुरे यांनी देशाचा कणा असलेल्या शेतकऱ्याला उपचारासाठी किंवा उदरनिर्वाहासाठी स्वतःची किडनी विकावी लागणे हे देशाचे आणि व्यवस्थेचे मोठे दुर्दैव असल्याचे सांगितले. शेतकऱ्याला हक्काचे पाणी आणि हमीभाव मिळाला, तर तो ताठ कण्याने उभा राहील. आत्महत्या रोखण्यासाठी प्रत्येक थेंब पाणी जमिनीत जिरवणे हाच एकमेव मार्ग असल्याचे अनासपुरे म्हणाले.
Web Summary : Distressed by farmer suicides and water scarcity, Nana Patekar questioned whether he should leave Maharashtra. He urged unity for water conservation, emphasizing action over empty promises at a Jal Kranti Parishad. Makrand Anaspure highlighted farmers' plight, stressing water access as crucial.
Web Summary : किसान आत्महत्याओं और पानी की कमी से व्यथित नाना पाटेकर ने पूछा कि क्या उन्हें महाराष्ट्र छोड़ देना चाहिए। उन्होंने जल संरक्षण के लिए एकता का आग्रह किया, जल क्रांति परिषद में खोखले वादों पर कार्रवाई पर जोर दिया। मकरंद अनासपुरे ने किसानों की दुर्दशा पर प्रकाश डाला, पानी की पहुंच को महत्वपूर्ण बताया।