पीकविम्यातून भरपाई जाहीर; १,२१९ कोटी रुपये मिळण्यास सुरुवात
By नितीन चौधरी | Updated: April 16, 2026 10:28 IST2026-04-16T10:27:27+5:302026-04-16T10:28:13+5:30
Crop Insurance: गेल्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीने झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी पंतप्रधान पीकविमा योजनेतून कृषी विमा कंपनीने पहिल्या टप्प्यात ३० जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना कापूस व तूर पिकेवगळता अन्य पिकांसाठी १ हजार २१९ कोटी रुपयांची भरपाई मान्य केली आहे.

पीकविम्यातून भरपाई जाहीर; १,२१९ कोटी रुपये मिळण्यास सुरुवात
- नितीन चौधरी
पुणे - गेल्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीने झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी पंतप्रधान पीकविमा योजनेतून कृषी विमा कंपनीने पहिल्या टप्प्यात ३० जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना कापूस व तूर पिकेवगळता अन्य पिकांसाठी १ हजार २१९ कोटी रुपयांची भरपाई मान्य केली आहे. यात प्रामुख्याने सोयाबीन पिकाचा समावेश आहे. सर्वाधिक ८१३ कोटी रुपयांची भरपाई नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाली आहे. दुसऱ्या टप्प्यात कापूस आणि तूर पिकांची नुकसानभरपाई मिळेल.
गेल्यावर्षी अतिवृष्टीमुळे खरिपात तब्बल ९८ लाख ४३ हजार ८२३ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले होते. पंतप्रधान खरीप पीकविमा योजनेतून हेक्टरी १७ हजार रुपये देण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते. पीकविमा योजनेतून देण्यात येणारी रक्कम ही पीक कापणी प्रयोगांवर आधारित आहे. त्यानुसार राज्यातील सुमारे १२ हजार महसूल मंडळांमधील (तलाठी सजा) पिकांच्या उत्पादनाची सरासरी काढून त्याची माहिती केंद्र सरकारच्या विमा पोर्टलवर टाकण्यात आली. उत्पादन कमी आले असले तरी नुकसानभरपाई मिळणार आहे.
७,५०० महसूल मंडळांची माहिती झाली पूर्ण
या १२ हजार महसूल मंडळांपैकी सुमारे साडेसात हजार मंडळांची नुकसानभरपाईची माहिती अंतिम झाली. त्यालाविमा कंपन्यांनी सहमती दर्शविल्यानंतर नुकसानभरपाई देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. कापूस आणि तूर या पिकांच्या काढणीचा हंगाम फेब्रुवारीअखेर असल्याने या उर्वरित पाच हजार मंडळांची माहिती येत्या काही दिवसांत पूर्ण होणार आहे
नुकसानभरपाई देण्यात आलेल्या प्रमुख पिकांमध्ये सोयाबीनचा समावेश असून सुमारे ३५ लाख हेक्टरवरील सोयाबीन पिकाचा विमा उतरविण्यात आला होता.
नुकसान भरपाईची मदत जिल्हानिहाय (आकडे लाखांत)
नांदेड ८१,३३७.९७
अहिल्यानगर ११,८३५.०४
हिंगोली ९,८९५.५६
परभणी ६,३७८.०२
गोंदिया ३,१०१.७७
ठाणे १,७९३.८२
पालघर १,५३४.७७
वर्धा ९६१.८२
नाशिक ८७८.७८
सोलापूर ६८४.०६
बुलढाणा ५६४.९८
भंडारा ४३३.६८
सातारा ३६२.१८
चंद्रपूर २६०.५०
अमरावती २५०.२०
गडचिरोली २२४.३६
नंदुरबार २०९.४१
जालना २०९.३३
नागपूर १९४.७०
अकोला १५८.९४
सांगली १२७.१४
वाशिम १०९.००
जळगाव १०६.९५
रायगड १०६.३४
धुळे १०३.१५
पुणे १००.०६
संभाजीनगर २५.०१
सिंधुदुर्ग २३.२९
रत्नागिरी ७.०८
कोल्हापूर ०.२७
एकूण १,२१,९७८.१८