जिल्हा परिषदेचे निकाल येताच CM देवेंद्र फडणवीसांना झाली अजितदादांची आठवण; म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 19:42 IST2026-02-09T19:41:44+5:302026-02-09T19:42:36+5:30
CM Devendra Fadnavis PC News: जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणूक निकालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.

जिल्हा परिषदेचे निकाल येताच CM देवेंद्र फडणवीसांना झाली अजितदादांची आठवण; म्हणाले...
CM Devendra Fadnavis PC News: राज्यातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, परभणी, लातूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या जिल्हा परिषदांचे निकाल जाहीर झाले. राज्यातील सत्तेत प्रमुख पक्ष असलेल्या भाजपाने सर्वाधिक जिल्हा परिषदांमध्ये सत्ता मिळवली आहे. महायुतीतील शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षालाही काही ठिकाणी यश मिळाले आहे. महाविकास आघाडीला जिल्हा परिषदा निवडणुकीतही फार चांगला कामगिरी करता आली नाही. यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या यांच्या निकालावर प्रतिक्रिया दिली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांची आठवण काढली.
पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, दुर्दैवाने या निवडणुकीदरम्यान आमचे महायुतीमधील एक वरिष्ठ नेते अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याचे दु:ख आम्हा सर्वांना आहे. त्यामुळे मी स्वत: निर्णय केला होता की, मी प्रचार करणार नाही. एका आवाहनाचा व्हिडिओ सगळ्या जिल्हा परिषदांमध्ये प्रसारित केला होता. पण एकूणच महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाची मानसिकता यामधून समोर आली आहे, असे ते म्हणाले.
जवळपास ६० ठिकाणी भाजपा एक नंबरवर
महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांचे निकाल हाती येत आहेत. आता मोजणीचा शेवटचा टप्पा चालू आहे. आत्तापर्यंत हाती आलेले निकाल आणि अंतिम टप्प्यातील कल लक्षात घेता, महाराष्ट्रातील जनतेने पुन्हा एकदा महायुतीवरच आपला विश्वास दाखवला आहे. १२ जिल्हा परिषदांमध्ये भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा सर्वात मोठा पक्ष म्हणून स्थापित झाल्याचे पाहायला मिळत आहे. जवळपास ६० ठिकाणी भाजपा एक नंबरवर आहे, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, भाजपाने आपला २०१७ चा रेकॉर्ड मोडला आहे, २०१७ मघ्ये या जिल्हा परिषदांमध्ये भाजपाला १४१ जागा होत्या, पण आत्तपर्यंत घोषित झालेल्या निकालांमध्येच २३६ जागा भाजपाला मिळाल्या आहेत. महायुतीला १२५ पैकी १०० च्या वर पंचायत समिती जिंकता आल्या आहेत, असेही फडणवीस यांनी नमूद केले.