संभाजी भिडे गुरुजींच्या विधानावर उदयनराजे आक्रमक; म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2021 16:43 IST2021-04-09T16:41:07+5:302021-04-09T16:43:49+5:30
संभाजी भिडे (sambhaji bhide) यांनी धक्कादायक आणि आक्षेपार्ह विधान केले होते. यावर प्रतिक्रिया देताना उदयनराजे (udayanraje bhosale) चांगलेच आक्रमक झाले.

संभाजी भिडे गुरुजींच्या विधानावर उदयनराजे आक्रमक; म्हणाले...
सातारा: राज्यातील कोरोनाची स्थिती, लसीकरण मोहीम, लसींचा तुटवडा यांवरून राजकारण तापताना दिसत आहे. केंद्र आणि राज्य सरकार यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. अशातच शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (sambhaji bhide) यांनी कोरोनामुळे मरणारी माणसे जगायच्या लायकीची नाहीत, असे धक्कादायक आणि आक्षेपार्ह विधान केले. या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते आणि खासदार उदयनराजे भोसले (udayanraje bhosale) चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. (udayanraje bhosale react on sambhaji bhide guruji statement over corona)
सांगली येथे बोलताना संभाजी भिडे गुरूजी यांनी कोरोना परिस्थितीवर भाष्य करताना धक्कादायक विधान केले. कोरोना हा रोग नसून, कोरोनाने मरणारी माणसे जगण्याच्या लायकीची नाहीत. जे जगायचे ते जगतील, जे मरायचे ते मरतील. लष्कराला काय मास्क लावून लढायला सांगणार आहोत का, असा रोकडा सवाल भिडे गुरूजींनी विचारला होता. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उदयनराजे यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली.
केंद्रावर आरोप करा व आपलं पाप झाका, ठाकरे सरकार एवढंच करतंय; विखे-पाटील आक्रमक
कोण काय म्हणाले ते मला विचारू नका
माझे प्रश्न मला विचारा, कोण काय म्हणाले ते मला विचारू नका. ते ज्या अँगलने बोलले त्यांनाच माहिती आहे. हवे तर मी त्यांच्याशी चर्चा करूनच बोलेन, असे उदयनराजे यांनी म्हटले आहे. देशात फॅमिली प्लॅनिंग केले असते तर आज कोरोना लसींचा साठा कमी पडला नसता. लोकसंख्या पाहूनच कोरोना लसींचे वाटप झाले पाहिजे. लसीच्या वाटपावरून उगाच वाद निर्माण करण्यात अर्थ नाही, असे मत उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले. तसेच लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे लॉकडाऊन हा पर्याय असू शकत नाही, असे उदयनराजे भोसले यांनी ठामपणे सांगितले.
कुटुंब सांभाळू शकत नाही, ती व्यक्ती कोरोना रुग्णांना कसं सांभाळणार? राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका
दरम्यान, दारुची दुकाने उघडी आहेत, त्यांना परवानगी दिली आहे. पण कोणी काही विकत बसला आहे, त्याला पोलीस काठ्या मारतात. काय चावटपणा चालला आहे. हा नालायकपणा, मूर्खपणा चालला आहे, लोकांनी बंड करुन उठायला हवे. असले हे शासन फेकून दिले पाहिजे. अजिबात उपयोगाचे नाही, असे संभाजी भिडे म्हणाले होते.