मुंबई: देशभरातील कोरोनाबाधितांच्या संख्येत महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे पाहायला मिळते. मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यातील अनेक ठिकाणी कोरोनाचा कहर कायम असल्याचे दिसून येत आहे. मात्र, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा लपवला जात असून, कोरोनाच्या संदर्भात आभासी चित्र रंगवले जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर आता प्रवीण दरेकर यांनीही ठाकरे सरकावर निशाणा साधला असून, कोरोनाच्या उपाययोजना करण्यापेक्षा ठाकरे सरकारचे पब्लिसिटी स्टंट करण्यावर जास्त लक्ष देत असल्याची टीका केली आहे. (bjp pravin darekar slams thackeray govt on corona situation in the state)
मुंबईसह संपूर्ण राज्यातील आरोग्यव्यवस्थेचा बोजवारा उडालेला असताना सरकार स्वतःची पाठ थोपटत बसले आहे. त्यापेक्षा कोरोनाच्या उपाययोजना करा, आम्ही सोबत आहोत, असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. प्रवीण दरेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली.
“राज्याला पुरेशा लसी कशा मिळतील, यासाठी एखादं पत्र केंद्राला जरुर लिहावं”
कौतुकाची प्रेसनोट मुख्यमंत्री कार्यालयातून
कौतुकाची प्रेसनोट मुख्यमंत्री कार्यालयातून आली आहे, पंतप्रधान कार्यालयातून नाही. आम्हाला कौतुक वाटत नाही पण आमचे म्हणणे हेच आहे की, मुंबईसह महाराष्ट्रामध्ये आरोग्यव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. आजही रुग्णांना, आयसीयू बेड, ऑक्सिजन असलेले बेड मिळत नाहीत, रेमडेसिविर मिळत नाही, असा दावा प्रवीण दरेकर यांनी केला आहे. आपली पाठ थोपटत बसण्यापेक्षा आरोग्य व्यवस्थेत ज्या कमतरता आहेत, त्या दूर करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आम्ही सगळे सोबत आहोत, असेही दरेकर यांनी सांगितले.
केंद्र सरकारने प्रचंड गोष्टी दिल्या
एखादी पीआर एजन्सी नेमून, बातम्या पेरुन आपले कोडकौतुक करायचे हे आता बास करा. लोकांना आता समजायला लागले आहे की, तुमच्या सगळ्या बातम्या पेरलेल्या आहेत. त्यामुळे करोनाच्या उपाययोजना करण्याऐवजी यांचा जास्त वेळ पब्लिसिटी स्टंट करण्यात जातो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारने प्रचंड गोष्टी दिल्या आहेत. म्हणूनच आज इथली आरोग्यव्यवस्था टिकून आहे. पण हे केंद्रावर टीका करणे थांबवत नाहीत, अशी टीका दरेकर यांनी यावेळी केली.
“देवेंद्र फडणवीसच आभासी”; मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावरून शिवसेनेचा पलटवार
दरम्यान, शनिवारी दिवसभरात राज्यात ८२ हजार २६६ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर, ५३ हजार ६०५ नवीन कोरोनाबाधित आढळले असून, ८६४ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यात एकूण ४३,४७,५९२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रिकव्हरी रेट ८६.०३ टक्के एवढे झाले आहे.