“राजकीय पोळी शेकण्यासाठी गलिच्छ राजकारण...”; गिरीश महाजनांची रोहित पवार यांच्यावर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 17:09 IST2026-03-08T17:09:47+5:302026-03-08T17:09:47+5:30
BJP Minister Girish Mahajan: कुणीही अकलेचे तारे तोडत आहेत. कुणाला काही वाटत असेल तर त्यांनी दिल्लीला जावे. अपील करायचे असेल तर ते करावे, असे गिरीश महाजन म्हणाले.

“राजकीय पोळी शेकण्यासाठी गलिच्छ राजकारण...”; गिरीश महाजनांची रोहित पवार यांच्यावर टीका
BJP Minister Girish Mahajan: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. यानंतर सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्याकडे असलेली सूत्रे हाती घेऊन राजकारणात सक्रीय झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार हे अजित पवार यांच्या अपघाती निधनाबाबत सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. वेगवेगळे दावे आणि खळबळजनक खुलासे करत आहेत. यावर आता गिरीश महाजनांनी प्रतिक्रिया दिली असून, गलिच्छ राजकारण सुरू असल्याचे म्हटले आहे.
या अपघाताची चौकशी सध्या विविध यंत्रणांकडून सुरू आहे. या प्रकरणाचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला असला तरी संपूर्ण आणि अंतिम अहवाल अद्याप प्रलंबित आहे विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल आता आला आहे. मात्र संपूर्ण अहवाल अद्याप आलेला नाही. त्यामुळे अंतिम अहवाल आल्यानंतरच या विषयावर अधिक सविस्तर बोलता येईल, असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी म्हटले होते.
राजकीय पोळी शेकण्यासाठी गलिच्छ राजकारण...
गलिच्छ राजकारण कुणाकडून सुरू आहे, हे सगळ्यांना दिसत आहे. मी पुन्हा सांगेन की, अजित पवारांच्या अपघाती निधनाचे राजकारण कुणीही करू नये. उगाच काहीही बोलले जाते आहे, कोण म्हणतेय की, बॉम्ब ठेवला, कुणी म्हणतेय सुसाईड बॉम्बर होता, वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. कुणीही अकलेचे तारे तोडत आहेत. या प्रकरणाची चौकशी व्हावी ही सगळ्यांची भावना आहे. मुख्यमंत्र्यांनाही हेच वाटते आहे. त्यामुळे राजकीय पोळी शेकण्यासाठी कुणी व्हल्गर विधान करू नये, असे सांगत गिरीश महाजन यांनी रोहित पवारांवर टीका केली.
दरम्यान, अजित पवार यांचे पुत्र जय पवार हे आता परिषद घेणार आहेत. यावर बोलताना, या अपघाताची सखोल चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने तसेच मुख्यमंत्री यांनी दिले आहेत. केंद्र शासनाकडूनही गंभीर दखल घेण्यात आली आहे. कुणाला काही वाटत असेल तर त्यांनी दिल्लीला जावे. अपील करायचे असेल तर ते करावे. कुणाला अर्ज करायचा असेल तर करू शकतात. काही मागणी करायची असेल तर करू शकतात. या प्रकरणाच्या चौकशीमध्ये १०० टक्के पारदर्शकता आहे. संभ्रम असण्याची काडीमात्र शक्यता नाही, असे महाजन यांनी नमूद केले.