'सरकारने खरात प्रकरणात प्रामाणिकपणे कारवाई केली तर डझनभर मंत्री तुरुंगात जातील’, हर्षवर्धन सपकाळ यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 12:40 IST2026-03-25T12:34:13+5:302026-03-25T12:40:05+5:30
Ashok Kharat Case: अनेक महिलांचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला भोंदू ज्योतिषी अशोक खरात याच्या चौकशीमधून अनेक गौप्यस्फोट होत आहेत. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणामध्ये गंभीर आरोप केला आहे.

'सरकारने खरात प्रकरणात प्रामाणिकपणे कारवाई केली तर डझनभर मंत्री तुरुंगात जातील’, हर्षवर्धन सपकाळ यांचा दावा
अनेक महिलांचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला भोंदू ज्योतिषी अशोक खरात याच्या चौकशीमधून अनेक गौप्यस्फोट होत आहेत. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणामध्ये गंभीर आरोप केला आहे. सरकारने भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात प्रामाणिकपणे कारवाई केली तर डझनभर मंत्री आणि दोन डझन अधिकारी जेलमध्ये जातील, असा दावा सपकाळ यांनी केला आहे.
अशोक खरात प्रकरणामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी समाजमाध्यमावरून गंभीर आरोप केले. त्यात त्यांनी लिहिले की, अशोक खरातच्या ईशानेश्वर मंदिराला देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने २०१८ साली १.५ कोटी रुपयांचा निधी दिला होता. फडणवीसांच्या कार्यालयात त्यावेळी कार्यरत असणारे व आता म्हाडाचे अधिकारी मिलिंद बोरीकर यांचे ही या बाबांशी अत्यंत जवळीकीचे संबंध आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचेही भोंदू सोबत फोटो समोर आले आहेत. एवढंच नाही तर मंत्री चंद्रकांत पाटील यांचे ही या भोंदू खरातशी अत्यंत जवळचे संबंध होते त्यांनीही मुख्यमंत्री होण्यासाठी या बाबाकडून अघोरी पुजा केल्याची माहिती मिळते आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांनी पुढे लिहिले की, भोंदू बाबाचे कारनामे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सहा महिन्यांपासून माहित होते. फडणवीसांच्या आजूबाजूचे लोक, मंत्रिमंडळातील सहकारी यांचे खरातशी संबंध असल्यानेच माहिती मिळूनही फडणवीसांनी काही कारवाई केली नव्हती. पण त्यांच्या मित्रपक्षातील सहकाऱ्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्रीपद घालवण्यासाठी खरातकडून तंत्र मंत्र आणि अघोरी पूजा केल्यानेच फडणवीसांनी भोंदू बाबा अशोक खरात विरोधात कारवाई सुरू केली.भोंदू बाबाच्या निमित्ताने ते आता मित्र पक्ष आणि पक्षातील हितशत्रूंना ब्लॅकमेल करत आहेत, असा दावाही हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.