Mayday कॉल दिला अन् ३ सेकंदांत विमान क्रॅश, इंधनाचा स्फोट झाल्याने गेला सर्व प्रवाशांचा जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 07:11 IST2026-01-29T07:10:56+5:302026-01-29T07:11:34+5:30
Ajit Pawar Death News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच लोकांचा मृत्यू झालेल्या मे.व्हीएसआर कंपनीच्या व्हीटी-एसएसके लेझर जेट ४५ या विमानाचा उतरतेवेळी १०० फुटांवर असताना तोल गेला. त्यामुळे ते विमान विमानतळावर कोसळले आणि विमानातील इंधनाचा स्फोट झाला. या अपघातात विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आता पुढे आली आहे.

Mayday कॉल दिला अन् ३ सेकंदांत विमान क्रॅश, इंधनाचा स्फोट झाल्याने गेला सर्व प्रवाशांचा जीव
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच लोकांचा मृत्यू झालेल्या मे.व्हीएसआर कंपनीच्या व्हीटी-एसएसके लेझर जेट ४५ या विमानाचा उतरतेवेळी १०० फुटांवर असताना तोल गेला. त्यामुळे ते विमान विमानतळावर कोसळले आणि विमानातील इंधनाचा स्फोट झाला. या अपघातात विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आता पुढे आली आहे.
यासंदर्भात नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून (डीजीसीए) प्राप्त माहितीनुसार, या विमानाने बुधवारी सकाळी ८ वाजता मुंबईहून बारामतीसाठी उड्डाण केले. त्यानंतर सकाळी ८ वाजून १८ मिनिटांनी पुण्याच्या आसपास असताना वैमानिकाने बारामती विमान वाहतूक नियंत्रण कक्षाशी (एटीसी) संपर्क साधला आणि तेथील वातावरणाच्या स्थितीची विचारणा केली. त्यानंतर पुन्हा हे विमान जेव्हा हवेत बारामतीपासून ५५ किलोमीटर अंतरावर असताना त्यांनी पुन्हा बारामती एटीसीशी संपर्क केला असता, त्यांना वारा स्थिर असून, दृष्यमानता ३००० मीटर इतकी असल्याची माहिती देण्यात आली.
विमान ज्यावेळी बारामती विमानतळाच्या रन-वे ११ पाशी उतरण्यासाठी आले, त्यावेळी त्यांना कमी दृश्यमानतेमुळे रन-वे दिसला नाही, तशी माहिती वैमानिकांनी एटीसीला कळविली आणि विमानाने पहिल्यावेळी लँडिंग करण्याचे टाळले. विमानतळाभोवती एक चक्कर मारली आणि पुन्हा उतरण्याचा प्रयत्न करताना एटीसीशी संपर्क साधला. एटीसीने त्यांना आता रन-वे दिसत आहे का, अशी विचारणा केली. मात्र, आम्हाला रन-वे दिसला की आम्ही संपर्क करू, असे वैमानिकाने एटीसीला कळविले.
एटीसीच्या सिग्नलला वैमानिकाचा प्रतिसाद नाही
पुढील काही क्षणांत वैमानिकाने रन-वे आम्हाला दिसत असल्याचे कळविले. त्यानुसार एटीसीने त्यांना उतरण्यासाठी हिरवा कंदील दिला. मात्र, एटीसीने दिलेल्या सिग्नलला वैमानिकाकडून प्रतिसाद मिळाला नाही आणि ८ वाजून ४४ मिनिटांनी विमान कोसळून मोठा स्फोट झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर विमानतळावर तैनात आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी तेथे तातडीने धाव घेतली. मात्र, तोवर काळाने घाला घातला होता. दरम्यान, आता या विमान अपघाताची चौकशी एअरक्राफ्ट अँक्सिडंट इन्व्हेस्टिगेशन ब्यूरो (एएआयबी) आणि डीजीसीएने सुरू केली आहे.
...तर टळला असता विमान अपघात, एक चूक महागात
मुंबई : बारामती विमानतळ हा मुळात नियमित किंवा विमान वाहतूक क्षेत्राच्या भाषेत ‘शेड्युल विमानसेवा’ म्हणतात (मोठी विमाने) त्यासाठी वापरला जात नाही; कारण तशा सुविधा तिथे उपलब्ध नाहीत. विशेषतः इथे रात्री विमान उतरण्याची सोय नाही. रात्री विमान उतरण्याची सोय ज्या विमानतळावर असते, तिथे धावपट्ट्यांवर मोठ्या प्रमाणावर लाइट लावलेले असतात. हे लाइट केवळ रात्रीच कामाला येतात असे नाही; तर ज्यावेळी दृश्यमानता कमी असते त्यावेळीही या लाइटच्या साहाय्याने वैमानिकाला विमान उतरण्यास मोठी मदत होते. जर अशी सुविधा बारामती विमानतळावर असती तर कदाचित ही दुर्घटना टळली असती.
या विमानाने केले होते १५ हजार तासांचे उड्डाण
अपघातग्रस्त विमान हे कॅनडास्थित बम्बार्डियर एरोस्पेस कंपनीने २०१० यावर्षी बनविले होते. गेल्या १६ वर्षांपासून ते कार्यरत होते आणि या विमानाने आजवर १५ हजार तासांपेक्षा जास्त काळ उड्डाण केले आहे. या विमानाला दोन इंजिन असून, या विमानाची प्रवासी संख्या ही आठ आहे.
जवळच्या अंतरासाठी वेगाने आणि सुरक्षितरीत्या धावण्यासाठी जगात याची ओळख आहे. जगभरात या कंपनीची एकूण २७ विमाने आहेत. या विमानाचे डीजीसीएने फेब्रुवारी २०२५ मध्ये ऑडिट केले होते आणि या विमानाला कोणताही धोका नसल्याचा निर्वाळा दिला होता. या विमानाची वैद्यकीय सुरक्षा चाचणी १२ जुलै २०२५ रोजी झाली होती आणि तीची वैधता २४ जुलै २०२६ पर्यंत होती.