राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत संभ्रम, अस्वस्थता...! तातडीने सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री, पक्षाचा अध्यक्ष करा; उपाध्यक्षांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 20:15 IST2026-01-29T20:13:21+5:302026-01-29T20:15:06+5:30
Ajit Pawar death aftermath: "अजितदादांच्या निधनानंतर कार्यकर्ता पोरका!" राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले आणि मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सुनेत्रा पवारांना पक्षाचे अध्यक्षपद आणि उपमुख्यमंत्रिपद देण्याची मागणी केली आहे. वाचा सविस्तर वृत्त.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत संभ्रम, अस्वस्थता...! तातडीने सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री, पक्षाचा अध्यक्ष करा; उपाध्यक्षांची मागणी
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले यांनी पक्षाचे वरिष्ठ नेते प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याकडे पक्षाची तातडीची बैठक बोलविण्याची मागणी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करून त्यांची तात्काळ राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती करावी, असे घुले यांनी पत्रात म्हटले आहे.
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता पोरका झाला आहे. त्यांच्या मनामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. गेले दोन दिवस माझ्या पुणे जिल्ह्यातून व राज्यातून अनेक कार्यकत्यांनी माझ्याशी संपर्क साधून उपमुख्यमंत्री पदी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची नियुक्ती करावी अशा भावना व्यक्त केल्या आहेत. यामुळे पक्षाची तातडीची बैठक बोलवून सुनेत्रा पवार यांची नियुक्ती करावी, यामुळे पक्षात निर्माण झालेला संभ्रम आणि अस्वस्थता दूर होऊन कार्यकर्ते जोमाने कामाला लागतील, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले यांनी केली आहे.
झिरवाळ यांचीही मागणी...
अजितदादांचे खरे उत्तराधिकारी सुनेत्रा वहिनीच असून, त्यांना तात्काळ राज्याचे उपमुख्यमंत्रिपद देण्यात यावे," अशी मागणी नरहरी झिरवाळ यांनी केली आहे. दोन्ही राष्ट्रवादी आता एकत्र आल्या आहेत आणि त्या पुढेही एकत्रच राहतील यात शंका नाही. कार्यकर्त्यांची आणि जनतेची हीच प्रामाणिक भावना आहे. दादांनी रक्ताचे पाणी करून पक्ष उभा केला. त्यांचा वारसा पुढे नेण्यासाठी सुनेत्रा वहिनींना सत्तेत आणि पक्षात मुख्य धुरा देणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे ते म्हणाले.