उदगीर तालुक्यात गारांचा पाऊस, वीज पडून जनावरे दगावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:19 AM2021-05-10T04:19:31+5:302021-05-10T04:19:31+5:30
गेल्या चार दिवसांपासून सतत वातावरणात बदल होऊन दुपारनंतर वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस होत आहे. रविवारी दुपारी ३.३० ...
गेल्या चार दिवसांपासून सतत वातावरणात बदल होऊन दुपारनंतर वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस होत आहे. रविवारी दुपारी ३.३० वा. सुमारास उदगीर शहर व तालुक्यात पाऊण तास अवकाळी पाऊस झाला. तालुक्यात काही ठिकाणी गाराही पडल्या. तोंडार, नेत्रगाव, बनशेळकी आदी भागात गारांसह पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले. काढणीला आलेले आंबे, रब्बी ज्वारी, फळभाज्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पावसामुळे रब्बी ज्वारीचा कडबा, सोयाबीनची गुळी भिजली आहे.
तालुक्यातील शंभू उमरगा येथील शिवदास गंगथडे (५२) यांच्यावर वीज पडल्याने ते जखमी झाले. त्यांना उदगीरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बोरगाव येथे वीज पडून माधव गोजेगावे यांची गाय मृत्युमुखी पडली.
देवणी येथे रविवारी दुपारी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात अर्धा तास जोरदार पाऊस झाला. तसेच तालुक्यातील वलांडी येथे जोरदार अर्धा तास पाऊस झाला. वीज पडून वलांडी येथील चंद्रकांत कासनाळे यांची म्हैस दगावली आहे. अहमदपूर तालुक्यातील किनगाव व परिसरात १५ ते २० मिनिटे जोरदार पाऊस झाला.
औराद परिसरात मोठे नुकसान...
निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी परिसरात रविवारी वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. मदनसुरी येथील रेखा संजय चाटले यांच्या शेतातील गायीवर वीज पडल्याने गाय दगावली. येळनूर येथील रमेश सोळंके यांची गाय व म्हैस मृत्युमुखी पडली. तसेच ताडमुगळी येथील शेषेराव पाटील यांच्या शेतातील गाय वीज पडल्याने दगावली. हलगरा येथील शेतकरी सुरेश गंगथडे यांची गाय आणि हंचनाळ येथील शेतकरी चंद्रकांत बिरादार यांचे दोन बैल वीज पडल्याने मृत्युमुखी पडले आहेत. तसेच सीमावर्ती भागातील कर्नाटकातील विंचूर येथील शेतकऱ्यांची जनावरे वीज पडल्याने मृत्युमुखी पडली आहेत. या पावसामुळे फळबागा व भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे.