जळकोट-पाटोदा मार्गावर भीषण अपघात; दाेन गंभीर, 'डेथ ट्रॅप' मानले पाटाेद्याचे जाणारे वळण धाेकादायक
By राजकुमार जोंधळे | Updated: March 10, 2026 05:36 IST2026-03-10T05:35:59+5:302026-03-10T05:36:40+5:30
जळकोट-उदगीर महामार्गावरील पाटोदा (बु.) येथील धोकादायक वळणावर दुचाकीचा साेमवारी भीषण अपघात झाला.

जळकोट-पाटोदा मार्गावर भीषण अपघात; दाेन गंभीर, 'डेथ ट्रॅप' मानले पाटाेद्याचे जाणारे वळण धाेकादायक
जळकोट (जि. लातूर) : जळकोट-उदगीर महामार्गावरील पाटोदा (बु.) येथील धोकादायक वळणावर दुचाकीचा साेमवारी भीषण अपघात झाला. यात दोन तरुण गंभीर जखमी झाले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. पुढील उपचारासाठी उदगीर उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
उत्तम एकनाथराव वाघमारे (रा. शिवाजीनगर तांडा) आणि मिलिंद गायकवाड (रा. आतनूर) हे दोघे जळकोट येथून शिवाजीनगर तांड्याकडे दुचाकीवरून जात हाेते. पाटोदानजीक धोकादायक वळणावर चालकाचा दुचाकीवरील ताबा सुटला. परिणामी, भरधाव दुचाकी थेट रस्त्यालगतच्या लोखंडी कठड्याला जाऊन आदळली अन् खड्ड्यात कोसळली. अपघाताची माहिती मिळताच काँग्रेसचे सचिन केंद्रे यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे पाहून त्यांनी रुग्णवाहिका बोलावली. स्वतः पुढाकार घेऊन जखमींना उदगीर येथे दाखल केले.
वळण रस्त्यावर अनेक अपघात...
पाटोदा येथील वळण रस्त्यावर यापूर्वीही अनेक अपघात झाले असून, अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. हे वळण अजून कितीजणांचा बळी घेणार? असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक विचारत आहेत. राष्ट्रीय महामार्ग विभागाने या वळणावर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.