औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 17:43 IST2025-12-14T17:43:15+5:302025-12-14T17:43:31+5:30
कार व हातातील कड्यावरून नातेवाईकांना मयताची ओळख पटली

औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
महेबूब बक्षी/औसा- रात्री ११:३० ते १२ वाजण्याच्या सुमारास औसा-सोलापूर महामार्गापासून ५०० मिटर अंतरावर वानवडा रस्त्यावर कार जळत असल्याचा ११२ ला कॉल आला. त्यानंतर तात्काळ औसा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असता, कार भीषण आगीत जळत असल्याचे दिसले. तात्काळ पोलिसांनी अग्निशमन दलाला बोलावून आग विझवण्याचा प्रयत्न केला. बऱ्याचवेळानंतर आग विझली, पण आतील दृष्य भयावहहोते. या आगीत एका ३५ वर्षीय तरुणांचा जळून कोळसा झाल्याचे पोलिसांना आढळले.
ही घटना अतिशय भयावह होती. तब्बल साडेतीन ते चार तास भीषण आगीत जळत असलेल्या (एम एच ४३ एबी ४२००) कारची राख झाली होती. तर आतील इसमही ९५ टक्के जळालेल्याने त्याच्या कवटीसह काही उरलेला भाग गोणीत भरुन नेण्यात आला.
माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेवून कार व आत मिळालेल्या कड्याच्या मदतीने मयत तरुण औसा तांडा येथील गणेश गोपीनाथ चव्हाण (वय ३५) असल्याचे सांगितले. मयताची डीएनए चाचणी केल्यानंतरच त्याची खरी ओळख पटेल, असे पोलिस निरीक्षक रेवणनाथ ढमाले यांनी सांगितले आहे.
ही संपूर्ण घटना पाहता गणेश चव्हाणचा घातपात झाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला असून, आरोपीला तात्काळ शोधा अशी मागणीही केली आहे. सध्या औसा पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
घातपात की आत्महत्या किंवा आणखीन काय? हे तपासात होणार निष्पन्न
नातेवाईकांच्या माहितीनुसार, मयत गणेश चव्हाण हा खाजगी कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत होता. त्याच्याकडे आर्थिक व्यवहारासह इतरही कामे होत होती. लातूर डिव्हीजनचा प्रमुख असलेल्या गणेश चव्हाण हा सध्या औशात वास्तव्यास होता. पैशाची देवाण-घेवाण, अनैतिक संबंध किंवा इतर कारणांची चौकशी केली जाणार आहे. त्यानंतरच या घटनेचे कारण समोर येईल. घटनेची सत्यता लवकरच समोर येईल असे पोलिस निरीक्षक ढमाले यांनी सांगितले.