उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 07:50 IST2026-04-14T07:46:43+5:302026-04-14T07:50:50+5:30
Heat wave: उत्तर भारतात निर्माण झालेल्या उच्च दाबाच्या क्षेत्राचा परिणाम अजूनही कायम असून, हवामानातील या बदलामुळे १५ एप्रिलपासून काही जिल्ह्यांत उष्णतेची लाट येईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
मुंबई - उत्तर भारतात निर्माण झालेल्या उच्च दाबाच्या क्षेत्राचा परिणाम अजूनही कायम असून, हवामानातील या बदलामुळे १५ एप्रिलपासून काही जिल्ह्यांत उष्णतेची लाट येईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच सध्याची स्थिती निवळल्यावर (१९ एप्रिलनंतर) राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, सोमवारी अकोल्यात सर्वाधिक ४३.८ अंश सेल्सियस इतक्या तापमानाची नोंद झाली.
गेल्या तीन दिवसांपासून राज्यभर कमाल तापमान अधिक नोंदविले जात आहे. तुलनेने मुंबईतील कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअसवर आहे. ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील चार ते पाच दिवस राज्याच्या कमाल तापमानात वाढ होईल. तर १५ एप्रिलपासून काही जिल्ह्यांत उष्णतेची लाट येईल. हवामान अभ्यासक अथ्रेय शेट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर भारतातील उच्च दाबाच्या क्षेत्रामुळे उष्ण वारे महाराष्ट्राकडे वाहत आहेत. परिणामी राज्यभरात, विशेषत: विदर्भात कमाल तापमान अधिक नोंदविले जात आहे.
मुंबईचे हवामान कसे आहे?
मुंबईत उष्ण आणि दमट हवामान कायम आहे. सलग तीन ते चार दिवसांपासून मुंंबईचे कमाल तापमान ३४ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत आहे.
सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंतचे ऊन मुंबईकरांना चटके देत आहे. पुढील ४८ तास असेच हवामान कायम राहील.
कुठे, किती कमाल तापमान : अकोला ४३.८, वर्धा ४३.१, अमरावती ४३.२, यवतमाळ ४३.२, सोलापूर ४२.५, वाशिम ४२.६, परभणी ४२.२, जळगाव ४२.१, गडचिरोली ४२, मालेगाव ४२, बुलडाणा ४१.५, जेऊर ४१.५, नागपूर ४१.४, छ. संभाजीनगर ४१.२, बीड ४०.७, गोंदिया ४०.५, धाराशिव ४०.३, सातारा ४०.३, सांगली ३८.८, नाशिक ३८.५, कोल्हापूर ३७.१, मुंबई ३२.८.