७५ वर्षीय शेतकऱ्याचा उष्माघाताने मृत्यू; लातूर जिल्ह्यात उन्हाच्या झळांनी घेतला चौथा बळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 05:53 IST2026-04-29T05:53:20+5:302026-04-29T05:53:47+5:30
नातेवाईकांनी त्यांना तातडीने पानचिंचोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.

७५ वर्षीय शेतकऱ्याचा उष्माघाताने मृत्यू; लातूर जिल्ह्यात उन्हाच्या झळांनी घेतला चौथा बळी
लातूर / निलंगा : उन्हाचा तडाखा रौद्ररूप धारण करत असून, उष्माघाताने आणखी एका शेतकऱ्याचा बळी घेतला आहे. निलंगा तालुक्यातील पानचिंचोली येथे मंगळवारी दुपारी स्वत:च्या शेतात जनावरांसाठी चारा कापत असताना ७५ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला. त्र्यंबक नारायण बेळंबे असे या शेतकऱ्याचे नाव असून, उष्माघाताने झालेला हा जिल्ह्यातील चौथा बळी आहे.
पानचिंचोली येथील त्र्यंबक बेळंबे हे मंगळवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास शेतात जनावरांसाठी चारा कापत होते. यावेळी उन्हाची तीव्रता प्रचंड होती. चारा जनावरांना दिल्यानंतर त्यांनी पाणी पिले आणि त्यांना अचानक चक्कर आली. त्यानंतर ते जमिनीवर कोसळले. नातेवाईकांनी त्यांना तातडीने पानचिंचोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. उन्हाच्या तीव्रतेमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.
लातूर जिल्ह्यातील मृतांची संख्या चार
लातूर जिल्ह्याचा पारा ४० ते ४१ अंशांवर आहे. वाढत्या तापमानाने आतापर्यंत चार जणांचे बळी घेतले आहेत. औसा तालुक्यातील गोंद्री येथे एका नऊ महिन्यांच्या चिमुरडीचा उष्माघाताने मृत्यू झाला. एरंडीत एका २५ वर्षीय तरुणाचा बळी गेला. औराद शहाजानी (ता. निलंगा) येथेही एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. तर मंगळवारी पानचिंचोली (ता. निलंगा) त्र्यंबक बेळंबे यांचा झालेला मृत्यू ही चौथी घटना ठरली आहे. दरम्यान, बेळंबे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
प्रशासनाचे आवाहन
दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळावे, कष्टाची कामे सकाळी १० वाजेच्या आत आणि सायंकाळी ५.३० वाजेनंतर करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ देऊ नये, घरामध्ये खेळती हवा राहावी, उन्हात जाणे टाळावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने केले आहे.