लोकमत न्यूज नेटवर्क
चंदगड : माणसाच्या जीवनात अनेक संकटांची वादळं येत असतात. मात्र, आपल्याला या संकटांशी धैर्याने सामना करून जीवन जगता आले पाहिजे. यासाठी नेहमी सकारात्मक विचार डोळ्यासमोर ठेवून कार्य करत राहिल्यास जीवन अधिक सुंदर होते, असे मत सदाशिव देसाई यांनी व्यक्त केले. कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्थेच्यावतीने कोरोना काळात मयत सभासदांच्या वारसांना कोवाड (ता. चंदगड) येथे मदत धनादेश वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य व्ही. वाय. कांबळे होते. यावेळी कोरोना काळात मयत झालेल्या सभासदांचे वारस माधुरी पुंडलिक गावडे, संजीवनी संजय शिवणगेकर, संगीता प्रमोद पाटील यांना संस्थेच्यावतीने सभासद कल्याण निधीतून धनादेशाचे वाटप करण्यात आला. यावेळी अनंत भोगण, धनाजी गुरव, दिलीप जाधव, संदीप शिंदे, गजानन पाटील यांच्यासह मयत सभासदांचे नातेवाईक उपस्थित होते.