Kolhapur: वाढत्या उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन; आजऱ्यातील धरणांमध्ये ६५ टक्के पाणीसाठा शिल्लक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 19:11 IST2026-03-17T19:11:27+5:302026-03-17T19:11:52+5:30
शेती व पिण्यासाठी जूनअखेर पाणी पुरेल असे नियोजन पाटबंधारे विभागाने केले

संग्रहित छाया
शीतल मोरे
आजरा : आजरा तालुक्यातील सर्वच धरणांमध्ये ६५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. शेती व पिण्यासाठी जूनअखेर पाणी पुरेल असे नियोजन पाटबंधारे विभागाने केले आहे. सर्वच धरणातून पाण्याची दोन आवर्तने पूर्ण केले असून तिसरे आवर्तन सुरू आहे. मात्र सध्या वाढलेल्या उष्णतेमुळे दररोज धरणातून ३ ते ४ दलघफू पाण्याचे बाष्पीभवन होत आहे.
पावसाळ्यात आजरा तालुक्यात प्रतिचेरापुंजीपेक्षा जास्त पाऊस पडतो. पाणी अडविण्यासाठी गेल्या ३० वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. चालूवर्षी सर्व धरणांमध्ये १०० टक्के पाणी साठा झाला आहे. धरणातील पाणी जवळपास १२ ते १३ हजार हेक्टर क्षेत्राला तर अनेक गावच्या पाणी योजना या धरणातील पाण्यावर अवलंबून आहेत.
पाटबंधारे विभागाने सर्वच धरणातून पाण्याची दोन आवर्तने पूर्ण केली असून तिसरे आवर्तन सुरू आहे. धरणातील पाण्यामुळे तालुक्यातील हिरण्यकेशी, चित्री, आंबेओहोळ, तारओहोळ या नद्यांमध्ये बारा महिने पाणी आहे. मात्र वाढलेल्या उष्णतेमुळे बाष्पीभवनाद्वारे पाण्याचे साठे झपाट्याने कमी होत आहेत.
धरणातील सध्याचा पाणीसाठा असा
चित्री - ६६ टक्के
उचंगी - ६५ टक्के
आंबेओहोळ - ८१ टक्के
सर्फनाला - ७३ टक्के
एरंडोळ - ६७ टक्के
धनगरवाडी - ५० टक्के
खानापूर - ५० टक्के
पाणी अडविण्यासाठी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे
चित्री - ५, सर्फनाला - ६, उचंगी - १२, आंबेओहोळ -७, धनगरवाडी - २ असे ३२ बंधारे बांधण्यात आले आहेत. सर्व बंधाऱ्यातून पाणी अडविल्यामुळे बंधारे तुडुंब आहेत.