कुंभोज : मराठी भाषेची सेवा करणाऱ्या प्रत्येकाचा उचित सन्मान करणे गरजेचे असून नव्याने लिहिते झालेल्या कवी- लेखकांचा गुण गौरव वाचकांनी त्यांच्या साहित्यकृती हाताळून करावा. भाषा संवर्धनासाठी विविध प्रयत्न होत असताना इतर भाषांचा द्वेष नको, असे प्रतिपादन कुंभोज ता. हातकणंगले येथील रयत गुरुकुल स्कूलचे प्राचार्य सागर माने यांनी केले. शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय यांच्या वतीने आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडा सांगता कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.
प्राचार्य माने म्हणाले, विद्यार्थ्यांना निव्वळ उपदेशाचे डोस नकोत. शाळा तसेच महाविद्यालय पातळीवर भाषा कृतीचे विविध उपक्रम राबवावेत. जोपर्यंत आपण मराठी भाषेत दडलेल्या सौंदर्याचा उपसा व नावीन्याची भर टाकत राहू तोपर्यंत मराठी भाषेला कसलीच भीती नाही.
कार्यक्रमास जयप्रकाश एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका प्रा. पी.एस. माने प्रभारी प्राचार्य घाटगे, मराठी विभागप्रमुख डॉ. सर्जेराव पद्माकर, समन्वयक प्रा. एस.एस. वडवे, मराठी शिक्षक संघाचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार सोनाळकर, एन.सी.सी. प्रमुख डॉ. रणजित माने, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होती. सूत्रसंचालन प्रा. सुप्रिया मोरे यांनी केले.