पंचगंगा नदी प्रदूषित करणाऱ्यांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:21 IST2021-01-21T04:21:24+5:302021-01-21T04:21:24+5:30
गांधीनगर : उचगाव व परिसरात जुन्या साड्यांवर केमिकलचा वापर करून त्या पंचगंगा नदीपात्रामध्ये धुतल्या जात असल्याने पंचगंगा नदी ...

पंचगंगा नदी प्रदूषित करणाऱ्यांवर कारवाई करा
गांधीनगर : उचगाव व परिसरात जुन्या साड्यांवर केमिकलचा वापर करून त्या पंचगंगा नदीपात्रामध्ये धुतल्या जात असल्याने पंचगंगा नदी प्रदूषित होत आहे. त्यामुळे नदी प्रदूषित करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी करवीर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर यांच्याकडे केली. निवेदनात म्हटले आहे की, उचगाव, चिंचवाड परिसरात जुन्या साड्यांची गोदामे आहेत. या साड्या रात्री-अपरात्री केमिकलच्या साहाय्याने नदीच्या पाण्यात धुतल्या जातात. त्यामुळे नदीचे पाणी प्रदूषित होते. धुतलेल्या साड्या प्रेस करून नव्याने दुकानात विक्रीसाठी ठेवल्या जातात. त्यामुळे ग्राहकांचीही फसवणूक होते. केंद्र व राज्य शासन पंचगंगा नदी प्रदूषण होऊ नये म्हणून कोट्यवधीचा निधी व उपाययोजना, जनजागृती करत असताना काही समाजकंटक जुन्या साड्या केमिकलच्या साहाय्याने धुऊन पंचगंगा नदीमध्ये प्रदूषण करत आहेत. त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. यापूर्वीही करवीरच्या तहसीलदार यांच्याकडे यासंदर्भात निवेदन देण्यात आले होते. मात्र, त्यांच्याकडून कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेने केली. प्रांताधिकारी यांच्यावतीने स्वीय सहायक संजय घोरपडे यांनी निवेदन स्वीकारले. शिष्टमंडळात करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, संतोष चौगुले, दिलीप सावंत, दीपक पोपटानी, दीपक अंकल, सुनील पारपाणी, योगेश लोहार, अजित चव्हाण, भूषण चौगुले, अजित पाटील, ओंकार जोशी, अकबर फकीर यांचा समावेश होता.
फोटो २० गांधीनगर नदी प्रदूषण
ओळ:- उचगाव व चिंचवाड परिसरात पंचगंगा प्रदूषित करणाऱ्यांवर कारवाई करा या मागणीचे निवेदन करवीर तालुका शिवसेनेच्या शिष्टमंडळाकडून स्वीकारताना प्रांताधिकारी यांचे स्वीय सहायक संजय घोरपडे, तालुका प्रमुख राजू यादव शिवसैनिक. तालुकाप्रमुख राजू यादव यांनी शिष्टमंडळाचे नेतृत्व केले.