कोलटकरांच्या कविता समजून घेण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:22 IST2021-01-21T04:22:04+5:302021-01-21T04:22:04+5:30
कोल्हापूर : मराठी कवितेच्या प्रांतामध्ये अरुण कोलटकर यांचे स्थान ध्रुवताऱ्याप्रमाणे अढळ आहे. त्यांच्या कवितेवर दुर्बोधतेचे आरोपण करण्याऐवजी ती समजून ...

कोलटकरांच्या कविता समजून घेण्याची गरज
कोल्हापूर : मराठी कवितेच्या प्रांतामध्ये अरुण कोलटकर यांचे स्थान ध्रुवताऱ्याप्रमाणे अढळ आहे. त्यांच्या कवितेवर दुर्बोधतेचे आरोपण करण्याऐवजी ती समजून घेण्याचा, समजावून सांगण्याचा प्रयत्न करण्याची खरी गरज आहे, असा सूर शिवाजी विद्यापीठात आयोजित ‘स्मरण अरुण कोलटकरांचे’ या चर्चासत्रात बुधवारी उमटला.
शिवाजी विद्यापीठाचा मराठी अधिविभाग आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याअंतर्गत हे चर्चासत्र घेण्यात आले. त्यामध्ये प्रा. अविनाश सप्रे (सांगली), गणेश विसपुते (पुणे), अरुण चव्हाण (सांगली), बाळासाहेब आळवेकर (कोल्हापूर) सहभागी झाले. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के होते.
कवितेच्या प्रांतात साचलेले निकृष्टपण दूर करण्यासाठीसुद्धा कोलटकरांच्या कवितेचा मापदंड लावणे गरजेचे आहे. दिलीप चित्रे, अरुण कोलटकर हे दोघे आजच्या नवकवींसमोर आदर्श म्हणून उभे आहेत, ही खूप महत्त्वाची बाब असल्याचे प्रा. अविनाश सप्रे यांनी सांगितले. कोलटकरांच्या साहित्याविषयी मराठी साहित्यिक क्षेत्रातच खरे तर मोठी अनास्था आहे. त्यांची कविता विस्मित करणारी, दीपवून टाकणारी असल्याचे कवी गणेश विसपुते यांनी सांगितले. जीवन आणि त्याचे महत्त्व समजून घेण्यासाठी कोलटकर हे महाराष्ट्रभर पायी फिरले. त्यांना समजून घ्यायला आपण अद्यापही कमी पडतो आहोत, हे खेदजनक असल्याचे अरुण चव्हाण यांनी सांगितले. मराठी अधिविभागाने भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने अरुण कोलटकरांसह अनेक नव्या-जुन्या प्रभावी साहित्यिक, कवींचा परिचय नव्या पिढीला घडवून आणला असल्याचे कुलगुरू डॉ. शिर्के यांनी सांगितले. त्यांनी कोलटकरांच्या ‘वामांगी’ कवितेचे वाचन केले. प्रा. श्रीकृष्ण कालगावकर यांच्या टिपणाचे वाचन सुश्मिता खुटाळे यांनी केले. कार्यक्रमाला डॉ. अवनिश पाटील, प्रकाश पवार, रघुनाथ कडाकणे, नीलांबरी जगताप, उदय कुलकर्णी आदी उपस्थित होते. मराठी अधिविभाग प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. नंदकुमार मोरे यांनी परिचय करून दिला.
चौकट
सांस्कृतिक चळवळीचे केंद्र
कोल्हापूर महानगरपालिकेकडून कोलटकर यांच्या स्मरणार्थ सभागृह उभारण्यात येत आहे. ते येथील सांस्कृतिक चळवळीचे केंद्र म्हणून पुढे यावे, अशी अपेक्षा बाळासाहेब आळवेकर यांनी व्यक्त केली.
फोटो (२००१२०२१-कोल-विद्यापीठ चर्चासत्र) : कोल्हापुरात बुधवारी शिवाजी विद्यापीठातील ‘स्मरण अरुण कोलटकरांचे’ या चर्चासत्रात कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी ‘वामांगी’ कवितेचे वाचन केले. यावेळी डावीकडून गणेश विसपुते, बाळासाहेब आळवेकर, अरुण चव्हाण, अविनाश सप्रे, रणधीर शिंदे, नंदकुमार मोरे उपस्थित होते.