मंत्री माणिकराव कोकाटेंना पोलिसांनीच पळवलं, प्रकाश आंबेडकर यांनी केली टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 17:38 IST2025-12-17T17:36:32+5:302025-12-17T17:38:15+5:30
''त्या' गोष्टी सार्वजनिकरित्या मांडू नयेत, पृथ्वीराज चव्हाणांनी हे पाळणे गरजेचे'

मंत्री माणिकराव कोकाटेंना पोलिसांनीच पळवलं, प्रकाश आंबेडकर यांनी केली टीका
कोल्हापूर: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी झाल्यानंतरही मंत्री गायब असणे गंभीर आहे. मंत्री गायब झाला असेल तर जनतेचं काय? असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला. कोर्टालाही मानत नाही आणि न्यायही अशी ही परिस्थिती आहे. त्यामुळे कायद्याचा अपमान होणार नाही याची दक्षता मुख्यमंत्री फडणवीस यांनी घ्यावी अशी अपेक्षा आंबेडकर यांनी व्यक्त केली.
वंचित बहुजन आघाडीच्यावतीने महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज, दुपारी दसरा चौक येथे महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रकाश आंबेडकर कोल्हापुरात आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना आंबेडकर म्हणाले, कोकाटे यांना मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून लपवले जात असल्याची परिस्थिती निर्माण झाली असल्याचा आरोप करत, दोन वर्षांची शिक्षा झाल्यास लोकप्रतिनिधीचा मताचा अधिकार संपुष्टात येतो, याची आठवण त्यांनी करून दिली.
शिवसेनेने स्वतःची पत घालवून घेतली
दरम्यान, नगरपालिकेला भाजप सोडुन युती झाली तशीच महानगरपालिकेत देखील भाजप सोडुन आघाडी करू असे सांगितले. ठाण्यात शिंदे गटाने चार दिवस थांबण्याचे केलेले आवाहनही चर्चेसाठी खुले असल्याचे त्यांनी सूचित केले. तर, शिवसेनेने मनसेसोबत जाऊन स्वतःची पत घालवून घेतली, त्यामुळे कोकणातील कुणबी, माथाडी कामगार, अमराठी वर्ग शिवसेनेपासून दूर झाल्याचा दावाही त्यांनी केला.
'त्या' गोष्टी सार्वजनिकरित्या मांडू नयेत, पृथ्वीराज चव्हाणांनी हे पाळणे गरजेचे
हर्षवर्धन सकपाळ यांच्या भेटीबाबत कोणताही राजकीय अर्थ काढू नये, असे सांगत, ती भेट त्यांच्या मुलीच्या इंग्लंडमधील शिक्षणाविषयीच्या चर्चेसाठी होती, असे आंबेडकर यांनी स्पष्ट केले. तसेच, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर भाष्य करताना आंबेडकर म्हणाले, राजकारणात असताना अनेक गोष्टी माहिती असतात, मात्र ज्या बाबी देशाच्या हिताच्या नसतात त्या सार्वजनिकरित्या मांडू नयेत, हे भान ठेवणे आवश्यक असते. पृथ्वीराज चव्हाण यांनी हे पाळणे गरजेचे होते असेही ते म्हणाले.