पंचगंगा प्रदूषणमुक्त करा, अन्यथा आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:23 IST2021-02-10T04:23:05+5:302021-02-10T04:23:05+5:30
शिरोळ : पंचगंगा नदी प्रदूषणास जबाबदार असणाऱ्या सर्व घटकांवर कारवाई करावी. शिवाय, प्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाययोजनांचा आराखडा तयार करण्यात ...

पंचगंगा प्रदूषणमुक्त करा, अन्यथा आंदोलन
शिरोळ : पंचगंगा नदी प्रदूषणास जबाबदार असणाऱ्या सर्व घटकांवर कारवाई करावी. शिवाय, प्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाययोजनांचा आराखडा तयार करण्यात यावा. येत्या सात दिवसांत पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा मंगळवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. पंचगंगा नदी प्रदूषणाची पाहणी करण्यास महसूल विभागाला भाग पाडून निवेदन देण्यात आले.
कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदी प्रदूषणाला कोल्हापूर महापालिका, इचलकरंजी वस्त्रोद्योग कारखाने, औद्योगिक वसाहती, थेट सांडपाणी सोडणारी गावे जबाबदार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात नदीचे प्रदूषण होत आहे. त्यामुळे विविध बंधाऱ्यांवर लाखो मृत माशांचा खच पडल्याचे दिसून येत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. अनेक लोकांना प्रदूषित पाण्यामुळे जीव गमवावा लागला आहे. इचलकरंजी शहरातील उद्योग व्यवसायातील प्रदूषित पाणी थेट नदीत मिसळते, हे गंभीर कारण असून प्रक्रिया न करता थेट नदीत पाणी सोडणाऱ्या घटकांवर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन नायब तहसीलदार संजय काटकर यांना देण्यात आले.
यावेळी सागर शंभूशेटे, पं. स. उपसभापती सचिन शिंदे, नगरसेवक प्रकाश गावडे, युनूस पटेल, तानाजी वठारे, बाळासाहेब कांबळे, दिलीप परीट, बंडू पाटील, अनिल चव्हाण, रामगोंडा खंजिरे, महावीर पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो - ०९०२२०२१-जेएवाय-०५
फोटो ओळ - शिरोळ येथे पंचगंगा नदीच्या प्रदूषणप्रश्नी स्वाभिमानीच्या वतीने नायब तहसीलदार संजय काटकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सागर शंभूशेटे, प्रकाश गावडे, युनूस पटेल, सचिन शिंदे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.