Kolhapur-ZP Election: ‘महाविकास’मध्ये मिटतंय तर ‘महायुती’मध्ये पेटलंय!; अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 13:14 IST2026-01-21T13:12:13+5:302026-01-21T13:14:31+5:30
काहींचे पक्षांतर, काहींचा इशारा

Kolhapur-ZP Election: ‘महाविकास’मध्ये मिटतंय तर ‘महायुती’मध्ये पेटलंय!; अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस
कोल्हापूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी इच्छुकांची संख्या वाढतच निघाल्याने आज बुधवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी प्रचंड झुंबड उडणार आहे. रात्री उशिरापर्यंत अनेक तालुक्यात राजकीय घडामोडी सुरूच होत्या. यामध्ये ‘महाविकास आघाडीमध्ये मिटतंय परंतु महायुतीमध्ये पेटलंय’ अशी स्थिती निर्माण झाली आहे.
प्रत्येक तालुक्यातील छोट्या गटांना, नेत्यांना स्थान देताना दोन्हीकडील नेत्यांची दमछाक होत आहे. उमेदवारी मिळणार नसल्याने पक्षांतरालाही प्रारंभ झाला असून राजीनामेही दिले जात आहेत. जिल्हा परिषदेसाठी २४९ तर पंचायत समितीसाठी ३०३ उमेदवारांनी आतापर्यंत अर्ज दाखल केले आहेत.
मंगळवारी दिवसभर झालेल्या घडामोडीत शिरोळ, हातकणंगले, गगनबावडा तालुक्यात शिंदेसेना आणि भाजप युती नक्की झाली आहे. हातकणंगलेमध्ये उर्वरित जागांसाठी जनसुराज्यसोबत चर्चा सुरू आहे. राधानगरीमध्ये शिंदेसेना-भाजप युती फिस्कटली आहे. तर भुदरगडचा निर्णय अजून झालेला नाही. शाहूवाडी, पन्हाळ्यात भाजप-जनसुराज्य स्वतंत्र लढणार आहे.
कागलमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप एकत्र आले असून शिंदेसेना स्वतंत्र आहे. तर चंदगडमध्ये भाजप स्वतंत्र लढेल हे स्पष्ट झाले आहे. आजऱ्यामध्ये दोन्हीकडे गोंधळ सुरू आहे. काँग्रेसचे ४० उमेदवार हात चिन्हावर रिंगणात उतरणार असून करवीर वगळता अन्य ११ तालुक्यातील जागा वाटपाचा प्रश्न मिटला असल्याचे सांगण्यात आले.
शीतल फराकटे यांची टीका
राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा शीतल फराकटे यांनी उमेदवारी मिळणार नसल्याने व्हिडिओच्या माध्यमातून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर टीका केली असून आम्ही केवळ सभाच गाजवायच्या का, असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी अपक्ष उभारणार असल्याचेही जाहीर केले.
ए.वाय. काँग्रेससोबत
जिल्हा बँकेचे संचालक ए.वाय. पाटील यांनी राधानगरी तालुक्यात काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. भोगावती कारखान्याचे संचालक धीरज डोंगळे यांना राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने उमेदवारी नाकारल्याने ते देखील काँग्रेसच्या संपर्कात आहेत.