लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : गडचिरोली वगळता राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची मतदान व मतमोजणीची प्रक्रिया संपल्याने आचारसंहिता संपुष्टात आल्याचे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. निवडून आलेल्या सदस्यांमधूनच एकाची सरपंचपदावर वर्णी लागणार असल्याने आता सगळ्यांचे डोळे सरपंचपदाच्या आरक्षणाकडे लागले आहेत. सरपंचपद आरक्षण सोडत २७ नंतर होण्याची शक्यता आहे.
मंगळवारी दिवसभर निवडणूक शाखेतर्फे विजयी उमेदवारांची पडताळणी करून त्यांची नावे जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू होती. २३ तारखेला जिल्हा नियोजन समितीची बैठक आहे. २४ ला सुट्टी त्यानंतर एकदिवस गेल्यानंतर लगेच २६ जानेवारीची सुट्टी आहे. त्यामुळे २७ तारखेनंतरच सरपंच आरक्षण सोडतीची तारीख जाहीर होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.
जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींसाठी डिसेंबर महिन्यात आचारासंहिता लागू झाली होती. त्यामुळे आचारसंहिता लागलेल्या गावांमध्ये विकासकामे थांबली होती. या निवडणुकीसाठी १५ तारखेला मतदान व सोमवारी मतमोजणी झाल्याने आता निवडणूक प्रक्रिया संपली आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने आचारसंहिता संपुष्टात आल्याची अधिकृत घोषणा केली आहे.