Ratnagiri-Nagpur Highway: मोजणीला आल्यास ड्रोनला मातीत गाडणार, महामार्ग कृती समितीचा भूमी अभिलेखला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 18:21 IST2025-06-24T18:20:42+5:302025-06-24T18:21:05+5:30
शिरोळ : रत्नागिरी - नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील बाधित दहा गावांतील राष्ट्रीय प्राधिकरण विभागाने ड्रोनद्वारे जमिनीचे मोजमाप करण्यात येणार आहे. ...

Ratnagiri-Nagpur Highway: मोजणीला आल्यास ड्रोनला मातीत गाडणार, महामार्ग कृती समितीचा भूमी अभिलेखला इशारा
शिरोळ : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील बाधित दहा गावांतील राष्ट्रीय प्राधिकरण विभागाने ड्रोनद्वारे जमिनीचे मोजमाप करण्यात येणार आहे. याबाबत शेतकऱ्यांना नोटिसाही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना चौपट भरपाईसह विविध मागण्या मान्य होण्यापूर्वी जमिनीच्या भूसंपादनासाठी सरकारने चुकीच्या पद्धतीने ड्रोनद्वारे कोणत्याही परिस्थितीत मोजणी होऊ देणार नाही.
मोजणीचे ड्रोन मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही व ही मोजणी रद्द करा अशा मागणीचे निवेदन राष्ट्रीय महामार्ग अन्याय निवारण कृती समितीच्यावतीने शिरोळ भूमी अभिलेख विभागाच्या उपअधीक्षक पल्लवी उगले यांना देण्यात आले.
बाधित दहा गावांच्या मागण्यांसाठी गेल्या दोन वर्षांपासून तीव्र लढा उभारला आहे. याबाबत केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, महसूल मंत्री, खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, राष्ट्रीय प्राधिकरण यांच्याकडे शेतकऱ्यांनी विविध मागण्या केल्या आहेत. जोपर्यंत चौपट भरपाईचा अद्यादेश निघत नाही तोपर्यंत येथील मोजणी करायची नाही असे आदेश पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी प्रशासनाला दिले होते.
असे असताना जिल्हाधिकाऱ्यांनी मनमानी पद्धतीने भूमी अभिलेख विभागाला वेठीस धरून माहीत नसलेल्या ड्रोन कंपनीद्वारे मोजणीचा घाट घातला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय मोजणी होऊ देणार नसल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी विक्रांत पाटील, सुधाकर पाटील, कीर्तीकुमार सावळवाडे, मिलिंद मगदूम, रावसाहेब कांबळे, प्रकाश पाटील, दिग्विजय सूर्यवंशी, अविनाश कोडोले यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.