कायदे उद्योजकांनीच पाळायचे का?
By Admin | Updated: August 20, 2015 00:45 IST2015-08-20T00:45:14+5:302015-08-20T00:45:14+5:30
शंतनू भडकमकर यांचा सवाल : गव्हर्निंग काउन्सिल बैठक

कायदे उद्योजकांनीच पाळायचे का?
कोल्हापूर : उद्योजकांनी सरकारचे कर भरून कायद्याचे पालन करायचे; पण सरकार उद्योजकांबाबत किती कायद्यांचे पालन करते? असा सवाल महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष शंतनू भडकमकर यांनी केला. कोल्हापुरातील उद्योजकांनी कर्नाटकात जाण्याचा विचार न करता येथेच स्थान बळकट करावे, असे आवाहनही त्यांनी केले. महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अॅँड अॅग्रिकल्चरच्या वतीने बुधवारी कोल्हापुरात गव्हर्निंग काउन्सिलची बैठक झाली. त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज होते. या बैठकीला धुळे, नाशिक, जळगाव, नागपूर येथील समितीचे ६५ सदस्य उपस्थित होते. भडकमकर म्हणाले, सध्या उद्योगासमोर अनेक अडचणी आहेत. शासन व उद्योग यांच्यामधील दुवा म्हणून चेंबर आॅफ कॉमर्स कार्यरत आहे. मोठ्या उद्योगांबरोबर लघू व मध्यम उद्योगधंद्यासाठी तरुणांना मार्गदर्शनाची भूमिका आमची असते. पश्चिम महाराष्ट्र उद्योगधंद्यांसाठी अतिशय चांगला असून, आगामी काळात येथेच लक्ष केंद्रित केले आहे. राज्य व केंद्र सरकारना उद्योजक विविध कर वेळेत भरून सहकार्य करतात; पण शासन म्हणून सरकारकडून जबाबदारी पार पाडली जात नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. कोल्हापुरातील उद्योग कर्नाटकात, तर विदर्भातील उद्योग छत्तीसगढ येथे निघाले आहेत. सोयी-सुविधा नसल्याने उद्योजकांनी ही भूमिका घेतली असली तरी येथून निघून जाणे तितकेसे सोपे नाही. दुसऱ्या राज्यात जाऊन आपले स्थान टिकविणे कठीण असल्याचेही भडकमकर यांनी सांगितले.
उद्योगात महाराष्ट्र अव्वल स्थानी आहे, याबाबत कोणाचेही दुमत नाही. भारतात गतीने परिवर्तन होत असल्याबद्दल समाधान व्यक्त करीत श्रीमंत छत्रपती शाहू महाराज म्हणाले, सरकारकडून रोज योजना ऐकावयास मिळते. हे चांगलेपणाचे द्योतक असले तरी या योजनांची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. चेंबर आॅफ कॉमर्समध्ये अॅग्रिकल्चरचा समावेश केल्याबद्दल आनंद होतो; पण शेती व्यवसायाची प्रगती ज्या गतीने सुरू आहे, ती चिंताजनक आहे. यासाठी उद्योजकांनी शेतीला आधुनिकतेची जोड देत परिवर्तन करावे, असे आवाहनही त्यांनी केले. महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सचे उपाध्यक्ष ललित गांधी यांनी कोल्हापुरातील उद्योजकांच्या अडचणी सांगितल्या. जयेश ओसवाल यांनी स्वागत केले. आनंद माने यांनी आभार मानले. ‘पुढारी’चे व्यवस्थापकीय संपादक योगेश जाधव, चेंबर्स आॅफ कॉमर्सचे उपाध्यक्ष संतोष मंडले, माजी अध्यक्ष आशिष पेडणेकर, अमित कामत, विलास शिरोरे, अरुण दांडेकर, नेहा खरे, संजय शेटे, प्रदीपभाई कापडिया, नितीन धूत, सीमा शहा, आदी उपस्थित होते.