लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : राज्य शासनाच्या बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या ऑनलाईन नोंदणीच्या आग्रहामुळे ३ लाख १८ हजार कामगार विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यापासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे कामगार नोंदणीची पूर्वीचीच ऑफलाईन पद्धत सुरू करा, अशी मागणी कामगार संघटनांनी केली आहे. बांधकाम कामगारांच्या संयुक्त कृती समितीच्यावतीने आज, मंगळवारी शाहू स्मारक भवनात ११ वाजता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये कामगारांच्या सर्व प्रश्नांविषयी चर्चा केली जाणार आहे. शंकर पुजारी, मिश्रीलाल जाजू, जोतीराम मोरे, गुणवंत नागटिळे, आनंदा गुरव, एकनाथ गुरव, अमित कदम, संदीप पाटोळे, के. पी. पाटील, विजय बचाटे, मच्छिंद्र कांबळे यांनी या मेळाव्याचे आयोजन केले.
गतवर्षीपासून कामगारांची नवी नोंदणी बंद आहे. या अर्जांचा निपटारा व्हावा. कामगारांच्या मुलींच्या लग्नासाठी प्रत्येकी ५० हजार रुपये द्यावेत, कायद्यातील तरतुदीनुसार कामगारांची नोंदणी व्हावी, ॲाक्टोबर २०२० पासून कामगारांना प्रतिमहिना पाच हजार रुपयांची आर्थिक मदत करावी, २३ मार्च २०२० पर्यंतचे सर्व कामगार जीवित असल्याचे जाहीर करून त्यांच्या नोंदणीचे नूतनीकरण करून त्यांना लाभ द्यावेत, लॉकडाऊन काळातील ज्यांना मदत मिळालेली नाही त्यांना ती मिळावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.