कोल्हापूर : गेल्या सहा महिन्यांत कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या आरपीआय कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांचे मंगळवारी कोल्हापुरात केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी स्वत: सांत्वन केले. लढाऊ शिलेदारांच्या जाण्याचे चळवळीला दु:ख आहे; पण यातूनही पुढे जात राहू, असे सांगत आठवले यांनी कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची ग्वाही दिली.
मुस्लिम बोर्डिंगमध्ये या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी आरपीआय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे होते. यावेळी प्रा. शहाजी कांबळे, मंगलराव माळगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कोरोनाच्या काळात कोल्हापुरातील ॲड. पंडितराव सडोलीकर, विलास भामटेकर, शा. शि. कवाळे, अरुण कडाळे, सखाराम कामत, राजू वसगडेकर, एस. पी. कांबळे, बबन सावंत, आनंदा कांबळे, किशोर माने, संतोष गायकवाड, सज्जन कांबळे यांचा मृत्यू झाला. आरपीआय चळवळीत या शिलेदारांचे मोलाचे योगदान होते. त्यांच्या जाण्याने चळवळीला मोठा धक्का बसला होता. या पार्श्वभूमीवर आरपीआयचे नेते मंत्री आठवले यांनी स्वत: येऊन कुटुंबीयांची भेट घेऊ असे सांगितले होते. त्यानुसार मंगळवारी ते आले आणि त्यांनी कुटुंबीयांना आश्वासक बोल सांगत कुटुंबीयांच्या आणि समाजाच्याही पाठीशी ठामपणे उभे राहू, अशी ग्वाही दिली.