युती तुटल्यास ‘भाजप’ची टीम तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 12:48 AM2019-09-19T00:48:39+5:302019-09-19T00:48:42+5:30

कोल्हापूर : भाजप-शिवसेना युती तुटलीच तर कोल्हापूर जिल्ह्यातील १० जागांपैकी चार मतदारसंघांमधील उमेदवार निश्चित असून उर्वरित सहा मतदारसंघांमध्ये मात्र ...

BJP is ready if alliance breaks | युती तुटल्यास ‘भाजप’ची टीम तयार

युती तुटल्यास ‘भाजप’ची टीम तयार

Next

कोल्हापूर : भाजप-शिवसेना युती तुटलीच तर कोल्हापूर जिल्ह्यातील १० जागांपैकी चार मतदारसंघांमधील उमेदवार निश्चित असून उर्वरित सहा मतदारसंघांमध्ये मात्र रस्सीखेच पाहावयास मिळणार आहे; त्यासाठी भाजपनेही आपला ‘बी प्लॅन’ तयार करून ठेवला आहे.
युती टिकणार की तुटणार हे येत्या चार दिवसांत स्पष्ट होणार असले तरी भाजपने आपली तयारी ठेवली आहे. गेल्या महिन्यात भाजपने मुलाखती घेतल्या; परंतु त्याला नावाजलेले पैलवान फारसे उपस्थित नव्हते. त्यामुळे उर्वरित सहा मतदारसंघांमध्ये वेळ पडल्यास अन्य पक्षांतून आयात केलेल्यांनाच भाजपची उमेदवारी असणार आहे.
इचलकरंजी येथून सुरेश हाळवणकर, कोल्हापूर दक्षिणमधून अमल महाडिक या दोन विद्यमान आमदारांची उमेदवारी निश्चित आहे. कागलमधून समरजितसिंह घाटगे यांची उमेदवारी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (दि. १७) जाहीर केली आहे तर सध्या सत्तेत सहभागी असलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक विनय कोरे यांच्यासाठी पन्हाळा मतदारसंघ सोडला जाण्याचीच शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर उर्वरित चंदगडमध्ये उमेदवारीचा मोठा पेच भाजपसमोर आहे. गोपाळराव पाटील, भरमूअण्णा पाटील, अशोक चराटी, रमेश रेडेकर, हेमंत कोलेकर, शिवाजी पाटील हे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत; तर राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्या कन्या नंदाताई यांना भाजपमध्ये घेऊन उमेदवारी देण्यासाठी खुद्द फडणवीस आग्रही असल्याचे समजते. मात्र, बाभूळकर यांच्या प्रवेशाला आमदार हाळवणकर यांचा विरोध असल्याची माहिती आहे. चंदगडकर यांनी सध्या हाळवणकर यांच्याकडे ‘बाभूळकर तेवढ्या नकोत,’ अशी भूमिका घेतली असून त्यासाठी दबावतंत्र वापरले जात आहे. मात्र, तरीही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भूमिका येथे महत्त्वाची ठरणार आहे.
राधानगरी मतदारसंघातून राहुल देसाई यांनी तयारी सुरू केली आहे. मुंबई, पुण्यात त्यांचे मेळावेही झाले आहेत. मात्र कोणत्याही परिस्थितीत ए. वाय. पाटील यांनी निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केल्याने हाळवणकरांशी त्यांचे असलेले नातेसंबंध लक्षात घेता, त्यांना भाजपमध्ये घेऊन उमेदवारी देण्याचीही चर्चा जोरात आहे.
कोल्हापूर उत्तरमध्ये गेल्या विधानसभेला कडवी झुंज दिलेले देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव हे यंदाही उमेदवारीचे प्रमुख दावेदार आहेत; परंतु शाहू महाराज यांचे मन वळवून मधुरिमाराजे यांना राजेश क्षीरसागर यांच्याविरोधात उतरविण्यासाठी भाजपही शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करील, अशीही चर्चा आहे.
हातकणगंले मतदारसंघ जनसुराज्यसाठी सोडायचा की भाजपकडे घ्यायचा या निर्णयावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. मात्र येथून जिल्हा परिषदेचे सदस्य अशोकराव माने यांनी कंबर कसली आहे. राजीव आवळेही हेदेखील ‘जनसुराज्य’कडून इच्छुक आहेत.
शिरोळ मतदारसंघातून अनिल यादव, राजवर्धन निंबाळकर हे इच्छुक असले तरी या ठिकाणी उद्योजक माधवराव घाटगे यांचा निर्णय महत्त्वाचा असेल. करवीरमध्ये माजी बांधकाम सभापती के. एस. चौगुले हेच एकमेव नाव सध्या तरी भाजपकडे आहे.

चंद्रकांत पाटील लढणार का ?
आपण स्वत: निवडणूक लढवणार नाही, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, त्यांना कोल्हापूर उत्तर आणि चंदगडमधून लढण्यासाठी अजूनही आग्रह धरला जात आहे. युती तुटलीच तर पाटील स्वत: रिंगणात उतरणार का, याचीही उत्सुकता कायम राहणार आहे. मात्र, युती तुटलीच तर काही ठिकाणी धक्कादायक नावेही भाजपकडून पुढे आणली जाण्याची शक्यता आहे.

Web Title: BJP is ready if alliance breaks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.