आणेवारीवरून आंदोलन पेटणार

By Admin | Updated: October 15, 2015 00:44 IST2015-10-14T23:52:10+5:302015-10-15T00:44:59+5:30

चिपरी, तमदलगेसह सात गावांचा समावेश : जयसिंगपुरात आज आंदोलनाची दिशा ठरणार

The agitation agitated from Awarivi | आणेवारीवरून आंदोलन पेटणार

आणेवारीवरून आंदोलन पेटणार

जयसिंगपूर : जैनापूर, निमशिरगाव, तमदलगे, कोंडिग्रे, चिपरी, धरणगुत्ती व हरोली या सात गावांत चुकीच्या पद्धतीने आणेवारी करण्यात आली असल्याचा आरोप ग्रामस्थांचा आहे. यामुळे आणेवारीवरून आंदोलन पेटण्याची शक्यता आहे. दरम्यान, फेर सर्वेक्षण करून आणेवारी कमी करावी, या मागणीसाठी सात गावांतील प्रतिनिधींची आज, गुरुवारी जयसिंगपूर येथे बैठक होणार आहे. याबैठकीत आंदोलनाची दिशा ठरणार आहे. यंदा पावसाअभावी खरीप हंगामातील पिके वाळून गेली असून, शेतकरी आर्थिक आरिष्ठात सापडला आहे. सात गावांत सरासरीपेक्षा कमी पाऊस कायमच पडतो. येथील ग्रामस्थांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. शासकीय कर्मचाऱ्यांनी परिसराची पाहणी न करताच आणेवारी वाढवून लावली आहे. त्यामुळे योग्य पंचनामे होऊन येथील नागरिकांना शासकीय लाभ मिळावा. याबाबत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा तहसीलदार सचिन गिरी यांना २५ सप्टेंबरला निवेदनद्वारे देण्यात आला होता.जैनापूर, निमशिरगाव, तमदलगे, कोंडिग्रे, चिपरी, हरोली व धरणगुत्ती ही सात गांवे टंचाईग्रस्त असून, याठिकाणी नेहमीच पावसाचे प्रमाण कमी असते. यावर्षी पावसाळा कोरडाच गेल्यामुळे खरीप हंगामात पेरणी झालेली पिके पूर्णत: वाळून गेली आहेत. तसेच येथील जनावरांच्या चाऱ्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या सात गावांची आणेवारी चुकीची झाली असून, सध्या ७१ टक्के नजर पैसेवारी दाखविली आहे. सदरची नजर पैसे आणेवारी फेर तपासणी करण्यात यावी. येथील गावातील आणेवारी ही ५० टक्यांहून कमी असून शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन आणेवारी निश्चित करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत असून, आंदोलन पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सात गावांतील प्रतिनिधींची गुरुवारी जयसिंगपूर येथे बैठक होणार असून, या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. एकूणच आणेवारीवरून गावातील वातावरण तापले आहे. (प्रतिनिधी)



जैनापूर, निमशिरगाव, तमदलगे, कोंडिग्रे, चिपरी, धरणगुत्ती व हरोली या सात गावांत चुकीच्या पद्धतीने आणेवारी झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप
फेर सर्वेक्षण करून आणेवारी कमी करण्याची मागणी
ही गावे टंचाईग्रस्त असून, याठिकाणी नेहमीच पावसाचे प्रमाण कमी असते. पावसाळा कोरडाच गेल्यामुळे पेरणी झालेली पिके वाळली आहेत.

Web Title: The agitation agitated from Awarivi