लग्नाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; भीषण अपघातात नवरीच्या भावासह, चुलते-चुलती, आजीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2022 15:59 IST2022-05-27T12:31:49+5:302022-05-27T15:59:44+5:30
पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर तवंदी घाटात उतारावरील हॉटेल अमरसमोर धोकादायक वळणावर भरधाव कंटेनरने कारला चिरडले.

लग्नाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; भीषण अपघातात नवरीच्या भावासह, चुलते-चुलती, आजीचा मृत्यू
निपाणी : मुलीच्या लग्नाला जाताना लग्नस्थापासून केवळ अर्धा किलोमीटर अंतरावर झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. या अपघातात नवरीच्या भावासह, चुलते चुलती व आजीचा मृत्यू झाला आहे. छाया आदगोंडा पाटील (वय ५५), आदगोंडा बाबू पाटील (५५) महेश देवगोंडा पाटील (२३) चंपाताई मगदूम (८०, सर्व रा. बोरगाववाडी ता. निपाणी) अशी मृत चौघांची नावे आहेत.
पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर तवंदी घाटात उतारावरील हॉटेल अमरसमोर धोकादायक वळणावर भरधाव कंटेनरने कारला चिरडले. या भीषण अपघातात कारमधील जारजण जागीच ठार झाले. हा अपघात आज, शुक्रवारी सकाळच्या सुमारास झाला.
स्तवनिधी येथे मंगल कार्यालयात लग्नकार्यासाठी सर्वजण जात होते. या वेळी हॉटेल अमर नजीक अपघात घडला. या अपघाताची भीषणता इतकी होती की वाहनांचा चक्काचूर झाला आहे. कंटेनरच्या धडकेत कारमध्ये मृतदेह अडकून पडले होते. दरम्यान घटनास्थळी जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निबरगी, डीएसपी बसवराज यलीगीर, सीपीआय संगमेश शिवयोगी उपनिरीक्षक कृष्णवेनी गुर्लहेसूर यांच्यासह अग्निशमन विभागाने भेट देऊन मदत कार्य सुरू केले आहे.