गटारांच्या झाकणांची चोरी थांबेना! पाकिस्तानात आला आता नवीन कायदा, थेट १० वर्ष शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 07:58 IST2026-02-10T06:59:44+5:302026-02-10T07:58:09+5:30
चोऱ्यामाऱ्या, लूटमार आणि गुंडगिरी, तर पाकिस्तानात कळसाला पोहोचली आहे. लोकांनी चोरावं तरी काय काय? पाकिस्तानी नागरिकांनी आता चक्क गटारींची झाकणं अर्थात लोखंडी ढापे चोरायला आणि विकायला सुरुवात केली आहे.

गटारांच्या झाकणांची चोरी थांबेना! पाकिस्तानात आला आता नवीन कायदा, थेट १० वर्ष शिक्षा
पाकिस्तानला भीकेचे किती डोहाळे लागावेत याला काही सीमा? काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी राजधानी इस्लामाबादमध्ये आपल्याच देशातील व्यावसायिकांपुढे बोलताना स्पष्टपणे कबुली दिली होती, दर काही दिवसांनी मला आणि फील्ड मार्शल आसिम मुनीर यांना देशोदेशी जाऊन कर्ज मागताना आता अतिशय लाज वाटते. कर्ज मागायचं तरी किती आणि कोणाकोणाकडे? अशावेळी आम्ही अतिशय लज्जित झालेलो असतो आणि आमची मान शरमेनं झुकलेली असते!..
चोऱ्यामाऱ्या, लूटमार आणि गुंडगिरी, तर पाकिस्तानात कळसाला पोहोचली आहे. लोकांनी चोरावं तरी काय काय? पाकिस्तानी नागरिकांनी आता चक्क गटारींची झाकणं अर्थात लोखंडी ढापे चोरायला आणि विकायला सुरुवात केली आहे. उघड्या गटारींमध्ये पडून निरपराध लोकांचा जीव जातो आहे. अलीकडेच या उघड्या गटारांत पडून काही महिला आणि त्यांच्या छोट्या मुलांचं निधन झालं. नागरिक आणि चोरट्यांना अनेकदा आवाहन करूनही गटाराच्या झाकणांची चोरी न थांबल्यामुळे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात आता याविरुद्ध ‘गटार लॉ’ हा कडक कायदाच करावा लागला आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी यासंदर्भात खेद व्यक्त करताना सांगितलं, आता जे कोणी चोरटे गटारींची झाकणं चोरून नेतील त्यांना दहा वर्षांपर्यंतचा तुरुंगवास आणि ५० लाख रुपयांपर्यंतचा दंड ठोठावला जाईल.
गटारीत पडून लोक मृत्युमुखी पडत असल्यामुळे अतिशय उद्वेगानं मुख्यमंत्री मरियम म्हणतात, गटारींची झाकणं रोजच्या रोज चोरीला जात आहेत. सकाळी बसविलेली झाकणं रात्रीपर्यंत गायब होतात. चोर गाढवगाडी घेऊन येतात आणि झाकणं चोरून नेतात. यामुळे लोकांचे जीव जाताहेत. गटरीच्या झाकणांची चोरी होण्यामागचं मुख्य कारण ही झाकणं मुख्यत: लोखंड किंवा स्टीलची बनलेली असतात. ही झाकणं विकून लोक पैसे कमवायचा प्रयत्न करताहेत. हा कायदा चोर, खरेदीदार आणि भंगारात ही झाकणं खरेदी-विक्री करणाऱ्यांनाही लागू असेल.
कंगाल पाकिस्तानात आता कोणालाच राहायचं नाही. त्यामुळे अनेक पाकिस्तानी नागरिकांचा परदेशी जाण्यासाठी आटापिटा सुरू असतो. आपल्या देशात आपली प्रगती होणं तर जाऊ द्या, पण भुकेनं जीव जाण्याचीच शक्यता अधिक, म्हणून अनेक जण विशेषत: आखाती देशात जातात. पण तिथे जाऊन हे पाकिस्तानी नागरिक करतात काय? - तर या देशांचा व्हिसा मिळाल्यानंतर ते पुन्हा मायदेशी येण्याचं नावच घेत नाहीत. त्याऐवजी ते या देशांमध्ये भीक मागतात! भीक मागूनही आपल्या देशापेक्षा तिथे त्यांची चांगली कमाई होते! काहीजण सामूहिक गुंडगिरीत सामील होतात, लोकांची लूटमार करतात, खून, दरोडे, बलात्कार यात ते अग्रेसर असतात. त्यामुळे बऱ्याच देशांनी पाकिस्तानी नागरिकांना आपल्या देशात येऊ देण्यास आता निर्बंध घातले आहेत.
आपली परिस्थिती सुधारावी म्हणून अनेक पाकिस्तानी नागरिकांनी तर आता चक्क गाढवं विकायला सुरुवात केली आहे. हे नागरिक गाढवं पाळतात आणि नंतर ते विशेषत: चीन आणि इतर देशांना विकतात! त्यातून त्यांचा चरितार्थ कसाबसा चालतो.