ह्रदयद्रावक! नातीचा मृतदेह मांडीवर ठेवून आजोबांनी काढली रात्र; चाळीसगावमधील संतापजनक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 12:16 IST2026-05-14T12:14:02+5:302026-05-14T12:16:06+5:30
लस घेतल्यानंतर काही मिनिटांतच तिची प्रकृती बिघडली आणि रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

ह्रदयद्रावक! नातीचा मृतदेह मांडीवर ठेवून आजोबांनी काढली रात्र; चाळीसगावमधील संतापजनक घटना
जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील टाकळी प्र.चा. येथे लसीकरणानंतर अडीच महिन्यांच्या सचिता बोरसे या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. लस घेतल्यानंतर काही मिनिटांतच तिची प्रकृती बिघडली आणि रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. शवविच्छेदनासाठी जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणल्यावर मृतदेह ताब्यात न घेतल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे आजोबा तुळशीदास मराठे यांनी नातीचा मृतदेह मांडीवर ठेवून रात्र काढली. या प्रकारामुळे आरोग्य यंत्रणेच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शवविच्छेदन रात्री करू नका; पण, किमान मृतदेह शवपेटीत ठेवा, असे आवाहन आजोबा तुळशीदास मराठे यांनी केले होते. मात्र, जीएमसी प्रशासनाने कुठलीही दयामाया दाखविली नाही, असे आजोबांनी सांगितले. या प्रकारामुळे आरोग्य यंत्रणेच्या संवेदनशीलतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून रोष व्यक्त केला जात आहे.
पंचनामा केला नाही : आरोग्य अधिकारी
शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. त्यातच लसीमुळे मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी तरी वाटत नाही. कारण, चौघींपैकी तिघींना कुठलाही त्रास झाला नाही. शवागारात मृतदेह नेण्याची जबाबदारी पोलिसांची होती. मात्र, पंचनामा केला नाही, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांनी सांगितले.
पोलिसांनी पंचनामा करून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवायला पाहिजे होता. आजोबांकडे पुरावा नसल्याने मृतदेह शवागारात ठेवणे योग्य नव्हते.
-डॉ. गिरीश ठाकूर, जीएमसी अधिष्ठाता