तापी तटावर वादळी पावसाने पिके जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 10:01 PM2021-05-27T22:01:52+5:302021-05-27T22:06:06+5:30

सातपुड्याच्या पायथ्यालगत मंगळवारी दुपारी तुफान वादळी पावसाने सुमारे चार ते पाच हजार हेक्टरमधील केळीबागा जमीनदोस्त केल्या.

Crops landed on Tapi coast due to heavy rains | तापी तटावर वादळी पावसाने पिके जमीनदोस्त

तापी तटावर वादळी पावसाने पिके जमीनदोस्त

Next
ठळक मुद्देरावेर तालुक्यात सुमारे चार-पाच हजार हेक्टरमधील ऐन कापणीवरील केळीबागा नामशेष. झाडे उन्मळून वाहतूक विस्कळीत, वीजखांब व ट्रान्स्फॉर्मर कोसळून  वीज खंडित.

लोकमत न्यूज नेटवर्क

रावेर : तालुक्यातील उत्तरेला सातपुड्याच्या पायथ्यालगत मंगळवारी दुपारी तुफान वादळी पावसाने सुमारे चार ते पाच हजार हेक्टरमधील ऐन हातातोंडाशी आलेल्या कापणीवरील केळीबागा जमीनदोस्त केल्या. यात कोट्यवधी रुपयांची अपरिमित हानी झाली आहे. या परिसरातील शेकडो लोकांच्या घरावरील तथा शेतमालाच्या गोदामांवरील टीनपत्र्याचे छत उडून वादळात बेपत्ता झाल्याने एकच हाहाकार उडाला आहे. 

रावेर तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्यालगतच्या मोहगण, अहिरवाडी व पाडळे शिवारातील केळीबागा वायव्यकडून आग्नेय दिशेला जाणाऱ्या वादळी पावसाच्या तडाख्यात भुईसपाट झाल्याने नुकसान झाले. मात्र काही मिनिटांचा तो क्षणिक ट्रेलर मंगळवारी दाखवत गुरुवारी दुपारी तीन ते चार वाजेच्या सुमारास मात्र तापीकाठच्या वीजांच्या कडकडाडात मुसळधार पावसासह तुफान वादळी वाऱ्यांच्या अकांडतांडवात खिर्डी, रेंभोटा, वाघाडी, शिंगाडी, धामोडी, सुलवाडी, कोळदा, ऐनपूर, निंबोल, विटवे, निंभोरासीम या गाव शिवारातील अंदाजित सुमारे तीन ते चार हजार हेक्टरमधील ऐन कापणीवरील केळीबागा जमीनदोस्त झाल्या. 

या तुफान वादळी पावसाचा आवेग एवढा भयावह होता की या परिसरातील ग्रामीण रस्त्यांवर व शेतीशिवारात मोठमोठे वृक्ष उन्मळून तथा वीजखांब व वीज ट्रान्स्फॉर्मर कोलमडून पडले. परिणामी या तापी काठावरील प्रभावित गावांना जोडणार्या ग्रामीण रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. 

तुफान वादळासह मुसळधार पावसामुळे तापीकाठच्या या गावांमधील असंख्य घरांवरील टीनपत्रे उडून बेपत्ता झाल्याने अनेकांचा संसार उघडय़ावर पडला आहे. अनेक शेतकर्‍यांच्या शेतमालाच्या गोदामांची आच्छादने उडून गेल्याने शेतमालाचे भिजून नुकसान झाले आहे.  महावितरणचे वीजखांब व वीज ट्रान्स्फॉर्मर कोलमडून पडल्याने तथा वीजतारा खंडित झाल्याने लाखो रुपयांची अपरिमित हानी झाली आहे. या आपद्ग्रस्त भागातील वीजपुरवठा व पर्यायाने नळपाणीपुरवठा योजना ठप्प पडून अंधाराच्या काळोखाचे सावट पसरले आहे. रात्री उशिरापर्यंत महावितरणचे उपकार्यकारी अभियंता प्रभुचरण चौधरी यांनी नुकसानीचे सर्व्हेक्षण करून गावागावातील गावठाण फिडर सुरू करण्यासाठी तातडीने मोहीम हाती घेतली आहे. 

 
तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी दिले पंचनाम्यांचे आदेश

तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी शुक्रवारपासून तापीकाठच्या या वादळी पावसात नुकसान झालेल्या शेतीगटातील शेतमालाच्या नुकसानीचे व घरांच्या नुकसानीचे पंचनामे उद्यापासून करण्याचे आदेश दिले आहेत. पं.स. सदस्य जितेंद्र पाटील यांनी शेत नुकसानीचे पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई देण्याची तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. 
 

मुक्ताईनगर तालुक्यात वादळी वारे व पावसाचा तडाखा 

मुक्ताईनगर  : तालुक्याला २७ मे रोजी दुपारी तीन ते सायंकाळी सहाच्या दरम्यान जबरदस्त वादळी वाऱ्याने तडाखा देत पावसाने झोडपले. या वादळी वाऱ्यामुळे तालुक्यातील नायगाव, पिंपरीनांदू , शेमळदे मुंढळदे, उचंदे, मेंढळदे या परिसरातील शेकडो हेक्टर शेत जमिनीवरील केळी पिकाचे नुकसान झाले आहे. तसेच घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Web Title: Crops landed on Tapi coast due to heavy rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.