कोरोना'नंतर काय? महामंदीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 12:59 PM2020-04-26T12:59:59+5:302020-04-26T13:05:14+5:30

सीए अनिलकुमार शाह गावांना स्वयंपूर्ण होणे हिताचे आहे. खेड्याकडे चला हा गांधीजींचा मंत्र आज कधी नव्हे इतका महत्वाचा आहे. ...

After Corona | कोरोना'नंतर काय? महामंदीचे संकट

कोरोना'नंतर काय? महामंदीचे संकट

Next

सीए अनिलकुमार शाह

गावांना स्वयंपूर्ण होणे हिताचे आहे. खेड्याकडे चला हा गांधीजींचा मंत्र आज कधी नव्हे इतका महत्वाचा आहे. न्यूयॉर्कसारख्या शहरात अक्षरश: मिळतील त्या उघड्या जागा, बागा, चर्च इ. इस्पितळ म्हणून वापराव्या लागत आहेत. शहराकडे जाणारे लोकांचे लोंढे एरवी शहरांना अभिमान वाटायला लावत होते. पण आज शहरातली प्रचंड मानवी वस्ती संकटांचे आगर झालेली आहे. मुंबईत धारावीसारख्या वस्तीत वेळीच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखला नाही तर मुंबईसाठी ती बॉम्बच ठरेल. एका जमातीच्या लोकांच्या एका सभेने सगळ्या देशाला मोठ्या धोक्यात ढकलून दिले आहे. धारावीसारख्या दाट वस्त्या त्यामुळेच मोठा धोका बनून उभ्या आहेत.
अलीकडच्या अनेक वर्षात विकसित देशांत अशी रोगराई पसरण्याची परिस्थिती कधीच उद्भवली नाही. अविकसित देशांना थोडा तरी याचा अनुभव आहे. त्यामुळे ती हाताळण्यासाठी कोणतीच व्यवस्था अगदी स्वप्नातही कुणी कल्पना करून ठेवली नव्हती.
जे आधी कधीच केले नाही अशा अनेक गोष्टी आता कराव्या लागणार आहेत. कितीतरी गोष्टी आधी येत नव्हत्या त्या शिकून घ्याव्या लागणार आहेत. खास करून संगणक व इंटरनेटसंबंधीच्या. अनेक नवीन ह्लस्किल्सह्व शिकणे अपरिहार्य होणार आहे. जे शिकतील व जुळवून घेतील तेच टिकतील.
जागतिक रंगमंचावर अनेक गोष्टी घडत आहेत. सगळ्या जगाची आर्थिक घडी मोडून ती नव्याने बांधायची तयारी सुरू आहे. त्यात अमेरिकेचे जगावरचे वर्चस्व मोडायला सुरुवात झाली आहेच. पण ती परत उसळी घेऊन टिकते की चीन व रशिया वर्चस्व निर्माण करतील ते येणारा काळच दाखवेल. यासोबत सगळ्याच देशात सामाजिक घडीसुद्धा बदलेल हे निर्विवाद.
कोरोनाचा परिणाम म्हणून आर्थिक मंदी तर अटळच आहे. सामन्यत: मंदी असेल तर अर्थव्यवस्था पूर्ववत व्हायला किमान सहा महिने तरी लागतात. पण आताच्या परिस्थितीत किती काळ लागेल ते मात्र सांगणे मुश्कील दिसते. कदाचित ही मंदी महामंदीदेखील होऊ शकते.
यातून बाहेर पडायला अर्थातच सगळ्याच देशांना अर्थव्यवस्थेत खूप पैसे ओतावे लागतील. ते कसे आणणार? एक तर करातून, बचत, कर्जे उभारून, देशी व परदेशी गुंतवणुकीतून. सद्य:स्थितीत कर वाढवणे शक्य नाही. म्हणजे मुख्य स्त्रोत कर्जे उभारणे, देशी व परदेशी गुंतवणुकी हाच राहील.
गुंतवणुकीसाठी बचत हवी असेल तर उत्पन्न पाहिजे. उत्पन्न पाहिजे असेल तर गुंतवणूक पाहिजे. असे हे गमतीशीर चक्र आहे. म्हणून उत्पन्नासाठी जागतिक व्यापारातून व जागतिक गुंतवणूकीतून पैसे उभारावे लागतील.
इंग्रज येण्याआधी भारताचा हिस्सा जागतिक व्यापारात जगात सगळ्यात जास्त होता. पण औद्योगिक क्रांतीनंतर आपला हिस्सा आपल्याला राखता आला नाही. हळूहळू आधी इंग्लंड, नंतर युरोप पुढे जर्मनी, जपान, अमेरिका करीत आता चीन जागतिक व्यापारातील सर्वात जास्त हिस्सा स्वतःकडेच राहील या प्रयत्नात आहे.
एकेकाळी जगात सगळ्यात जास्त निर्यात करणारा देश असणारा भारत निर्यातीत मागे का पडला? तर औद्योगिक क्रांतीनंतर जग पूर्णत: व वेगाने बदलले. मात्र त्या वेगाने त्यासोबत आपण बदललो नाही. मसाले, कापड, कलाकुसरीच्या वस्तू, धातूच्या वस्तू हे आपल्या निर्यातीत होते. स्वत:ची उत्पादने विकण्यासाठी इंग्रजांनी येथील कला व विद्या दोन्ही नष्ट केले. निसर्गाचे अपरिमित नुकसान केले. म्हणजे वेगाशी आपण जुळवून घ्यायची शक्यताच इंग्रजांनी नष्ट केली. तेथून आपण मागे फेकले गेलो.
आताच्या संकटात भारताच्या अर्थव्यवस्थेचे नुकसान होणार आहेच. पण भारताला अपार संधीसुद्धा आहेत. आताचा भारत इंग्रज आले तेव्हाच्या भारतापेक्षा खूप बदललेला आहे. दबलेली गुणवत्ता उसळून बाहेर येण्यासाठी पूर्ण संधी आता उपलब्ध आहेत. अनेक क्षेत्रात भारताला संधी आहेत. शिवाय जग ज्या वेगाने बदलत आहे त्या वेगाने बदलण्याच्या मार्गावर भारत नक्कीच खूप पुढे गेला आहे.
आज जरी आपण सगळे घरात बंदिस्त असलो तरी जागतिक व्यापार कधीच थांबवता येणार नाही. चीनची उत्पादने घेऊ नका, असे कितीही ठरवले तरी ते थांबवता येणे मुश्कीलच आहे. कारण कोणताच देश स्वयंपूर्ण नाही. त्यामुळे जगातले सगळे देश एकमेकांशी व्यापारात गुंतलेले आहेत. कुणीच या जागतिक व्यापारातून वंचित राहू इच्छित नाही. कारण सगळ्यांनाच त्यातून फायदा मिळतो. गेल्या दशकातील आकडेवारीने हे सिध्द केले आहे की जागतिक व्यापारात ज्या देशांचा सहभाग होता त्या सर्वांना त्याचा फायदाच झाला आहे.
शेती, फलोत्पादन, डेअरी उत्पादने, मांस, मासे, समुद्री उत्पादने, व यासंबंधित मालाच्या निर्यातीत भारताला प्रचंड संधी आहेत. मात्र त्यासाठी सरकारी आडमुठा दृष्टीकोन व लाल फीतीचे अडथळे दूर व्हायलाच हवेत. तसेच पर्यटन उद्योगातही खूप संधी आहेत. जमीन, सागर किनारा, वाळू, तलाव, डोंगरकडे, नद्या, जंगले, ऐतिहासिक स्थळे, व उत्खनन स्थळे यावर सरकारची जीवघेणी पकड आहे. कदाचित यामुळेच दुरवस्थाही. ती दूर केली तर यातून प्रचंड मोठी परदेशी चलनाची गंगाजळी व मोठी रोजगार निर्मिती होऊ शकते. अमेरिकासारख्या देशालासुद्धा आज डॉक्टर्स व नर्सेस यांची वानवा जाणवत आहे. हे एक उदाहरण झाले. आपण अनेक सेवा क्षेत्रात जगाचे पुरवठादार होऊ शकतो इतकी क्षमता आपली आहे. मागच्या दशकात संगणक तंत्रज्ञानाने आपल्या देशाला मोठे परकीय चलन मिळवून दिले. तसेच अनेक भारतीयांना परदेशी नोकरीच्या संधीसुद्धा. या सगळ्या संधींचा उपयोग या संकटाच्या निमित्ताने आपण करून घेऊ शकतो. प्रत्येक संकटात एक संधी दडलेली असते. हे संकट चीनच्या पुढाकाराने आले असले तरी भारताला त्याचा फायदा नक्कीच घेता येऊ शकतो.
ता. क.
हा लेख लिहिल्यानंतर दुस-याच दिवशी जपानने सर्व जपानी कंपन्यांना त्यांचे चीनमधले कारखाने गुंडाळा व जपान किंवा इतर आशियायी देशात हलवा असे आवाहन केले आहे. त्यासाठी भरघोस आर्थिक मदतसुद्धा जाहीर केली आहे. भारत याचा फायदा उठवू शकतो. ही या आर्थिक युद्धातली पहिली ठिणगी आहे. हे युद्ध अजून काय काय नवीन समीकरणे बनवते त्यावर सर्वांचेच लक्ष असणार आहे.

 

 

Web Title: After Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.