'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाक लष्करप्रमुख मुनीर संतापले होते; जैश कमांडरचा खळबळजनक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 18:50 IST2026-02-07T18:46:41+5:302026-02-07T18:50:18+5:30
पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा चेहरा पुन्हा एकदा जगासमोर उघडा पडला आहे.

'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाक लष्करप्रमुख मुनीर संतापले होते; जैश कमांडरचा खळबळजनक खुलासा
पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा चेहरा पुन्हा एकदा जगासमोर उघडा पडला आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये भरलेल्या एका जिहादी मेळाव्यात दहशतवादी संघटना 'जैश-ए-मोहम्मद'चा टॉप कमांडर मसूद इलियास काश्मीरी उर्फ अबू मोहम्मद याने अनेक धक्कादायक कबुलनामे दिले आहेत. भारताने केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आसिम मुनीर यांनीच 'गजवा-ए-हिंद'चा नारा दिला होता, असा खळबळजनक दावा या दहशतवाद्याने केला आहे.
आसिम मुनीर यांचा भडकाऊ चेहरा समोर
रावलाकोटच्या सप्लाय बाजार चौकात जैशच्या सशस्त्र दहशतवाद्यांनी गुरुवारी मोठी गर्दी जमवली होती. यावेळी बोलताना अबू मोहम्मदने पाकिस्तानच्या लष्करी नेतृत्वाचे पितळ उघडे पाडले. तो म्हणाला की, "भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'नंतर दोन्ही देशांत चार दिवस संघर्ष झाला, तेव्हा फील्ड मार्शल आसिम मुनीर यांनी या युद्धाला 'गजवा-ए-हिंद' असे संबोधले होते." विशेष म्हणजे, भारताने जैशच्या तळांवर केलेल्या हल्ल्यानंतर मुनीर यांनी भारताविरुद्ध उघडपणे जिहाद पुकारण्याची घोषणा केली होती.
मसूद अजहरच्या कुटुंबाचा बहावलपूरमध्ये खात्मा
अबू मोहम्मद हा तोच दहशतवादी आहे ज्याने सर्वात आधी 'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाची कबुली दिली होती. मे २०२५ मध्ये भारताने केलेल्या या कारवाईत जैशचा म्होरक्या मौलाना मसूद अजहरचे कुटुंब बहावलपूरमध्ये मारले गेले होते. पाकिस्तानने या कारवाईला प्रत्युत्तर देण्यासाठी 'बुनयान अल मरसूस' नावाचे अभियान चालवले होते, मात्र भारताच्या मुत्सद्देगिरीने आणि पुराव्यांनी पाकिस्तानचा हा बनाव जगासमोर फसला होता.
दहशतवाद्यांचे मेळावे आणि भारताला धमक्या
पाकिस्तानमध्ये एकीकडे 'इस्लामिक स्टेट खोरासान'ने मशिदीत घडवून आणलेल्या स्फोटात ३१ जणांचा बळी गेला असताना, दुसरीकडे पाक सरकार दहशतवाद्यांना उघडपणे रॅली काढण्यासाठी संरक्षण देत आहे.
पाकिस्तानचा दुटप्पीपणा उघडा
स्वतःचा देश दहशतवादाने होरपळत असतानाही पाकिस्तान सरकार आणि लष्कर भारताच्या विरोधात जिहादी संघटनांना रसद पुरवत असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे. ५ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानच्या अनेक शहरांमध्ये दहशतवाद्यांनी खुलेआम फिरून चिथावणीखोर भाषणे दिली, ज्याला स्थानिक प्रशासनाचे मूक समर्थन लाभल्याचे दिसून आले.